लखनौ – उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) बेकायदा धर्मांतर प्रकरणास्तव अटक केलेल्या आठ जणांवर देशाविरूध्द युध्द पुकारल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एटीसने दाखल केलेल्या अर्जानुसार लखनौ न्यायालयाने त्यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलन 121-अ (कलम 121 नुसार शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्हाचा कट रचणे) आणि कलम 123 ( देशाविरूध्द युध्द पुकारणे) असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कलम 121 भारत सरकारविरोधात युध्द, युध्दाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांशी संबंधित आहे. एटीएसने 21 जूनला महमंद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगिर अलम कासमी या दोन मौलानांना दिल्लीत अटक केली होती. हजारो नागरिकांचे धर्मांतर घडवून आणणारे रॅकेट उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यावेळी एटीएसने केला होता. इस्लामीक दवा सेंटरच्या नावा खाली आरोपींनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवल्याचा दावा करत एटीएसने आणखी आठ जणांना अटक केली होती. अपंग, महिला, बेरोजगार आणि गरीबांना चांगले शिक्षण, विवाह, नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणत असल्याचा आरोप केला.
अटक केलेल्या 10 आरोपींपैकी चार जण महाराष्ट्रातील असून दोन जण दिल्लीचे रहिवासी आहेत. तर हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील प्रत्येकी एक आरोपी आहे.
भादंवि 121 अ आणि 123 लावलेल्यांमध्ये महंमद उमर गौतम, मुफ्ति काझी जहांगीर अलम कासमी, सलाहुद्दिन जैन्नुदिन शेख, इरफान शेख उर्फ इरफान खान, डॉ, फराझ, प्रसाद रामेश्वर कावरे उर्फ आदम, भूप्रिय बंडो उर्फ अर्सालन, आणि कौसर आलम यांचा समाव्रेश आहे.
या आठ जणांवर कलम 121 अ आणि 123 लावण्यासाठी पुरेसे पुरावे गोळा केले असल्याचा दावा करून एटीएसने केस डायरी न्यायालयात हजर केली. त्याची खातरजमा केल्यानंतर न्यायालयाने ही कलमे लावण्यास मान्यता दिल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.