लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांना आता ३० दिवसांहून कमी कालावधी उरला आहे. अशातच राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
राज्यातील ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी सर्वप्रथम मंत्रिपदाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्यापाठोपाठ बुधवारी आणखी एक ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या यादीमध्ये आज धरम सिंह सैनी यांची भर पडली असून त्यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अन्य नेत्यांप्रमाणेच सैनी यांनी देखील अखिलेश यादव यांची भेट घेतली.
अशातच आता सैनी यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत दररोज एक मंत्री व ३ ते ४ आमदार भाजपमधून बाहेर पडतील असं सैनी म्हणालेत.
“मी राजीनामा देण्याचं कारण म्हणजे गेल्या ५ वर्षांमध्ये दलितांना व इतर मागासवर्गीयांना दाबण्यात आलंय. त्यांचा आवाज दाबण्यात आलाय. स्वामी मौर्य प्रसाद जे काही सांगितील ते आम्ही करू. येत्या २० जानेवारीपर्यंत दररोज एक मंत्री व ३ ते ४ आमदार भाजपमधून बाहेर पडतील.” असा दावा सैनी यांनी केला आहे.
तत्पूर्वी, उत्तरप्रदेशचे 18 मंत्री आठवडाभरात त्यांच्या पदांचे राजीनामे देतील. दररोज एक-दोन मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडतील, असा दावा प्रभावी ओबीसी नेते ओमप्रकाश राजभर यांनी बुधवारी केला होता.
I have resigned because for 5 years Dalits, backward classes were suppressed, their voices were suppressed… We will do whatever Swami Prasad Maurya will say. One minister and 3-4 MLAs will resign every day till Jan 20: Dharam Singh Saini after resigning from the UP cabinet pic.twitter.com/1z4Coqs6Zt
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2022
या नेत्यांचा भाजपला रामराम
- इतर मागासवर्गीय नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्य मंत्रिमंडळ सोडले होते.
- भाजपचे आमदार अवतार सिंह भडाना यांनी बुधवारी पक्ष सोडला आणि सपा सहयोगी असलेल्या राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केला.
- भाजपचे अन्य तीन आमदार – तिंदवारीचे ब्रजेश प्रजापती, तिल्हारचे रोशन लाल वर्मा आणि बिल्हौरचे भगवती सागर – यांनी पक्षाचा राजीनामा जाहीर केला.
- मंगळवारी बिधुना येथील विनय कुमार शाक्य यांनीही राजीनामा जाहीर केला.
- आमदार मुकेश वर्मा यांनीही भाजप पक्षाला सोडचिट्ठी दिली.