वाघोली (प्रतिनिधी) – पुणे-अहमदनगर रस्ता रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. याच रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी लोणीकंद वाहतूक पोलिसांनी सोडवली आहे; मात्र पावसाच्या पाण्यामुळे नगर रस्त्या पाणीमय होऊ लागला आहे. रस्त्यावरून वाहणार्या पाण्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले आहे.
पावसात कोंडी होऊ नये म्हणून एकीकडे पोलीस उपाययोजना करत आहेत तर दुसर्या बाजूला वाहतूक कोंडी साठी जबाबदार असणारे इतर विभाग मात्र हात वर करून उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सर्जेराव पाटील, प्रताप मानकर यांनी वाघोलीमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्वाची कामगिरी केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एम. हाके यांनी जास्तीचे पोलीस दल, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे ग्रामपंचायतीच्या मदतीने काढून वाहतूक कोंडी मुक्त परिसर बनवला आहे. पण अवकाळी पावसाचे पाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. त्यामुळे रस्तावरून वाहणार्या पाण्यामुळे अचानक वाहतूक कोंडी वाढू लागली आहे.
पुणे मनपा लगत खांदवे नगरपासून ते बकोरी फाटा पर्यत पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहून वाहतूक कोंडीला निमंत्रण दिले जात आहे. याबाबत तातडीने पीएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाचे पाणी काढण्यासाठी ग्रामस्थ, मनपा प्रशासन पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे; मात्र याबाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्या सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडीएच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. -संदीप सातव, सदस्य लोकप्रतिनिधी समिती पुणे मनपा