जामखेड – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आज बुधवारी (दि. 17) सायंकाळी जामखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चार जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. याबाबत तहसीलदार गणेश माळी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन गायी, एक बैल व एक वासरू यांचा मृत्यू झाला आहे. तसेच फळपीकांचेही काही भागात नुकसान झाले आहे. वीजेच्या कडकडाटामुळे जामखेड शहरातील लाईटही पाच ते सहा तासांपासून बंद होती. अनेक ठिकाणी झाडांवर वीजा पडलेल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद पडलेली आहेत. तहसीलदार गणेश माळी यांनी नुकसानग्रस्त पिकांचे, मृत्यू पावलेल्या जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी साकत येथे पांडुरंग वराट यांचा बैल वीज पडून मृत्यू झाला होता. तसेच १७ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील कुसडगाव येथील बिभीषण रामचंद्र भोरे यांची गाय, जवळके येथील अंकुश वाळुंजकर यांची गाय, दादासाहेब हाडोळे यांचा बैल तर भुतवडा येथील उद्धव पांडुरंग डोके यांचे एक वासरू वीज पडून मृत्यू पावले आहे.