पुणे – राज्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील काही भागांत रिमझिम पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. मुंबईत पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. तर पुण्यातही ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. तर रायगडमध्येही रविवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबारमध्येही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूरमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबईत पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण
दरम्यान, मुंबईत पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर सरासरीपेक्षा कमी तापमान असेल. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे.
कमी दाबाचे क्षेत्र निवळले
अरबी समुद्राच्या आग्नेय भागाकडे सक्रीय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळताना दिसत आहे. तर, लक्षद्वीपच्या किनारपट्टी भागावर वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कर्नाटकच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत आता नव्याने कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होताना दिसत आहे.
कर्नाटकातील या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम उत्तर प्रदेशापर्यंत दिसत असून, महाराष्ट्रावर असणारे पावसाचे सावट याच हवामान स्थितीचे परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.