उन्नाव – उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास तीन मुली एका शेतात बेशुध्दावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यातील दोघींचा मृत्यू झाला असून तिसरीवर उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावातील वातावरण तापले असून हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
काही स्थानिकांनी या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत धरणे आंदोलन सुरू केले असून स्थिती हाताबाहेर जाउ नये म्हणून राज्य सरकारही सतर्क झाले असून लगतच्या सर्व गावांतील पोलीस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आल्यामुळे या गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
काजोल, रोशनी आणि कोमल या तीन मुली संशयास्पदरित्या बेशुध्दावस्थेत सापडल्या होत्या. याबाबत बोलताना मयत काजोलच्या आईने सांगितले की बुधवारी तीन्ही मुली सोबतच बाहेर पडल्या होत्या. मात्र घरी परतल्या नाहीत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिघींची चांगली मैत्री होती व त्या चारा आणण्यासाठी एकत्रच जात असत. आता दोन मुली मरण पावल्या असल्यामुळे या घटनेने गंभीर वळण घेतले असून गावकऱ्यांनी धरणे सुरू केले आहे.
दरम्यान, काजोलच्या पित्याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावल्यामुळे तणावात आणखीनच भर पडली. गावकऱ्यांच्या दबवामुळे अखेर काजोलच्या पित्याला परत पाठवण्यात आले. पण आपल्यावर कोणाचाही दबाव नसून आपल्याला केवळ न्याय हवा असल्याचे काजोलच्या पित्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी या घटनेत लक्ष घातले असून काही तासांतच हा राजकीय मुद्दा झाला आहे. तिसऱ्या मुलीच्या जिवाला धोका असल्यामुळे तिला तातडीने दिल्लीला पाठवण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
पीडितांच्या कुटुंबियांना नजरकैदेत ठेवल्याच्या बातम्या असून हा न्यायाच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रकार आहे. त्यांना नजरकैदेत ठेवून काय मिळणार आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. तर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनाची सुरूवात केली असून गावाच्या सीमेवर राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांची गर्दी झाली आहे. यावेळी पोलीस प्रशसनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे सरकार केवळ दलितांचा आवाज चिरडत नसून महिलांचा सन्मान आणि मानवाधिकार चिरडते आहे. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावे की मी आणि पूर्ण कॉंग्रेस पक्ष पीडितांचा आवाज बनून येथे उभे आहोत आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून देउ.
– राहुल गांधी, कॉंग्रेस नेते
उन्नावची घटना हादरवणारी आहे. मुलींच्या कुटुबियांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. तिसऱ्या मुलीवर ताबडतोब उपचार केले जावेत. या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे.
प्रियांका गांधी-वढेरा, कॉंग्रेस नेत्या
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14, 15 आणि 16 वर्षांच्या या तीन मुली चारा आणण्यासाठी बुधवारी दुपारी बाहेर पडल्या होत्या. संध्याकाळ झाल्यावरही त्या परत न आल्यामुळे त्यांचा शोध सुरू करण्यात आला. तेव्हा त्या एका शेतात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यातील दोघींचा मृत्यू झाला असून तिसरी बेशुध्दावस्थेत होती.