नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील दुर्बलांना परवडणारी घरं देण्यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2023 पर्यंत देशामध्ये 80 लाख नवीन घरं बांधणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, देशातील दुर्बल घटकांना तसेच केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरं या उद्देशासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 48 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. त्यामध्ये 80 लाख नवीन घरं बांधण्यात येतील.
केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार घर खरेदीसाठी सबसिडी देते. या योजनेचा लाभ घेऊन आपण जास्तीत जास्त 2.67 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवू शकतो. नवीन घर खरेदी केल्यावर, लोकांना गृहकर्जावर सरकारकडून सबसिडी मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो.