- राष्ट्रवादीचे प्राथमिक वर्चस्व
- भाजपाच्या अनेक नगरसेवकांचे वॉर्ड फुटले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारुप प्रभागरचना आज (दि. 1) अखेर जाहीर करण्यात आली. या प्रभागरचनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच प्राथमिकदृष्ट्या प्राबल्य दिसून येत असून भाजपाच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड फुटले आहेत. तर भाजपाच्या एकगठ्ठा मतदानालाही छेद बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सन 2017 च्या निवडणुकीत राज्यातील सत्तेचा फायदा उठवत ज्या पद्धतीने भाजपाने अपेक्षित प्रभागरचना करून घेतली होती, त्याच धर्तीवर राष्ट्रवादीनेही प्रभागरचना करून घेत उट्टे काढल्याचे मानले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित असताना प्रभार रचनेस झालेला उशीर, करोनाची तिसरी लाट आणि ओबीसी आरक्षण या सारख्या मुद्यांमुळे प्रभागरचनेस विलंब लागला होता. अत्यंत उत्कंठा शिगेला पोहोचविणारी आणि इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांचे राजकीय भविष्य ठरविणारी प्रारुप प्रभागरचना महापालिकेकडून आज जाहीर करण्यात आली.
सन 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून ही प्रभागरचना करण्यात आली असून 139 नगरसेवकांसाठी 46 वॉर्डांची रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये 45 वॉर्ड हे तीन नगरसेवकांचे असणार असून 1 वॉर्ड हा 4 नगरसेवकांचा आहे. तळवडे हा पहिल्या क्रमांकाचा वॉर्ड हा 40 हजार 767 लोकसंख्येचा वॉर्ड आहे. तर या वॉर्डातील अनुसूचित जाती संवर्गाची लोकसंख्या 5 हजार 348 इतकी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 956 इतकी आहे. तर शेवटचा वॉर्ड हा सांगवी असून या वॉर्डाची रचना चार नगरसेवकांसाठीची आहे. या वॉर्डाची लोकसंख्या 46 हजार 979 इतकी असून या वॉर्डातील अनुसूचित जाती संवर्गाची लोकसंख्या 7 हजार 919 इतकी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1303 इतकी आहे. त्यामुळे या वॉर्डातील एक जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार हे जवळपास निश्चित आहे.
प्रभाग आराखडा पहायला गर्दी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह आठही प्रभाग कार्यालयांमध्ये एकाच वेळी म्हणजे आज (दि. 1) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केला. आज आराखडा जाहीर होणार हे माहित असल्यामुळे इच्छुकांसह नागरिकांनी सर्वच ठिकाणी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक प्रभागाच्या रचनेची स्वतंत्र प्रिंट काढून इमारतीमध्ये चिकटविण्यात आली होती. हा आराखडा पहावयास पावणे दहापासून नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. आराखडा जाहीर होताच मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)