लखनौ -उत्तरप्रदेशातील न्यायालयाने सोमवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे. त्या प्रकरणात आतापर्यंत आशिषसह 13 आरोपींना अटक झाली आहे.
लखीमपूर खेरीत ऑक्टोबरमध्ये एका वाहनाने चिरडल्याने 4 शेतकरी मृत्युमुखी पडले. ते वाहन आशिषचे असल्याचे समोर आले. त्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. संबंधित प्रकरणाचा तपास उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
लखीमपूर खेरी प्रकरणावरून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. मंत्रिपदावरून हकालपट्टी करून मिश्रा यांना अटक करण्यात यावी, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे.