मुंबई – गेल्या 20 महिन्यापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढून सध्या उच्च पातळीवर आहेत. निर्देशांका फुगले असतानाच रिझर्व बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे बऱ्याच ब्रोकरेज संस्था लघु पल्ल्यात गुंतवणूकदारांना नफा काढून घेण्याचा सल्ला देत आहेत.
सीएलएसए या ब्रोकरेज संस्थेने म्हटले आहे की. एप्रिल 2020 पासून सेन्सेक्स 120 टक्क्यांनी तर निफ्टी 124 टक्क्यांनी वाढला आहे. आता निर्देशांक वाढीस फारसा वाव उरलेला नाही असे सीएलएसएला वाटते. नोमुरा, यूपीएस, मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेज संस्थांनी या अगोदर अशाच प्रकारचे सल्ले सूचित केले आहेत. सीएलएसएने म्हटले आहे की जागतिक बाजारात क्रुडचे दर वाढत असल्यामुळे भारतातच नाही तर जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम संभवतो. रिझर्व बॅंकही महागाई वाढल्यामुळे आगामी काळामध्ये महागाई रोखण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. कच्चा माल महागल्यामुळे पक्क्या मालाच्या किमती वाढून विक्री कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अवस्थेत कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. एप्रिल 2022 पासून रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीमध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारही अंग काढून घेण्याची शक्यता असून गेल्या सात महिन्यात या गुंतवणूकदाराने 10 हजार कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. कंपन्यांचे बाजार मूल्य आवश्यकतेपेक्षा जास्त झाले असल्याचे बहुतांश संस्थांनी म्हटले आहे.
रिझर्व्ह बॅंकेनेही अशा प्रकारचे मत काही महिन्यापूर्वी व्यक्त केले होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये मॉर्गन स्टॅनली या संस्थेने भारतातील कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले असल्याचे म्हटले होते. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी फेडरल रिझर्व बरोबरच रिझर्व बॅंक वजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळामध्ये कंपन्याचे बाजारमुल्य सध्याच्या पातळीवर कायम राहण्याची शक्यता कमी आहे.