भुवनेश्वर – लॉकडाऊनच्या काळात ओडिशात परत आलेल्या प्रवासी श्रमिकांना पुन्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचते करण्यासाठी ओडिशातून देशाच्या विविध भागात श्रमिक स्पेशल ट्रेन्स पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे केली आहे.
त्यांनी गोयल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की मला स्थलांतरीत कामगारांची अनेक शिष्टमंडळे भेटली आहेत. त्यांनी आम्हाला आमच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या कामगारांना कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी लवकरात लवकर ओडिशातून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की ओडिशातील अनेक गरीब मजुर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अशा राज्यांमध्ये कामाला गेले होते. पण लॉकडाऊनच्या काळात हे मजुर त्यांच्या ओडिशातील गावी परत आले आहेत.
आता अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर व्हायचे आहे. पण तेथे जाण्यासाठी रेल्वेच उपलब्ध नसल्याने हे लोक ओडिशातच अडकून पडले आहेत. त्यांच्या रोजगाराचा विचार करून या गाड्या त्वरीत सोडल्या जाव्यात अशी मागणी प्रधान यांनी केली आहे.