माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे माणसाला समूहाने राहायला आवडते. हे आपण पुस्तकातील अगदी मानवाच्या अश्मयुगीन इतिहासातूनही शिकलो आहे. त्यानंतर “एकीचे बळ’ कसे उपयुक्त असते हेही शालेय जीवनापासून आपल्या मनावर कोरलेले आहे. मात्र असे असूनही आज एकाकीपणा, स्वमग्नता, स्वार्थ, एकलकोंडेपणा आणि लोकांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती बळावत चालली आहे. यातून वैफल्य येऊन अनेक अनुचित प्रकारही घडताना दिसतात. हे झाले वैयक्तिक जीवनातील किंवा नातेसंबंधातील.
या व्यतिरिक्त सामाजिक किंवा कार्यालयीन जीवनातही स्पर्धेतून एकीला फाटा दिला जातो. परिणामी वादविवाद, गटतट आणि वैर वाढत जाते. एकीमध्ये मोठे बळ आहे परंतु ते बळ अबाधित राखता आले पाहिजे. संघभावना किंवा एकजूट ही मानवी जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्य असो, नातेसंबंध असो, नोकरी-उद्योग असो, खेळ असो किंवा सामाजिक जीवन असो एकजुटीला पर्याय नाही. एकदा एका फळविक्रेत्याकडे गेलो. त्याला विचारले, केळी कशी डझन दिली? तो बोलला, “साहेब 40 रुपये डझन आहेत.’ पुढे तो उत्साहाने म्हणाला, “साहेब 1 नंबर केळी आहेत बिंदास्त घ्या.’ त्याच्या त्या केळीच्या घडाशेजारीच जवळपास दोन डझनहून अधिक सुटी केळी ठेवली होती. मी त्याला मुद्दाम विचारले, “ती सुटी केळी काय भावाने देणार? तो म्हणाला,”चाळीस रुपयांत सगळी घेऊन जा.’
एकीकडे घडाला लगडलेली एक डझन केळी 40 रु. डझन तर दुसरीकडे सुटी दोन डझनांहून अधिक केळी केवळ 40 रुपयांत. मी मुद्दाम त्याला प्रश्न केला, “असे का? सुटी केळी एवढी स्वस्त? ती गोड नाही का?’ त्यावर तो बोलला, “साहेब, घडाला असणारी केळी दोन दिवस व्यवस्थित टिकतील. पण सुटी केळी आज रात्रीपर्यंत टिकली तरी बेहत्तर.’ यातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली एकजुटीची किंमत जास्त असते मात्र एकजूट सुटली की किंमत कमी झालीच म्हणून समजा. एकटा हत्ती कितीही शक्तिशाली असला तरी मुंग्यांच्या एकीपुढे त्याचाही निभाव लागत नाही हे तर आपल्याला माहीतच आहे. संस्था संघटनेत एकजुटीवर त्या संघटनेचे आणि वैयक्तिक हित अवलंबून असते. याबाबत एक समर्पक असा प्रसंग आहे-
एका संघटनेत एक पदाधिकारी होता. तो संघटनेत सक्रिय होता. तो सर्वांना परिचित आणि आदरणीय होता. अचानक त्याच्यातील अहंभाव जागा झाला. त्याच्याशिवाय संघटना चालूच शकत नाही या अविर्भावात तो निष्क्रिय झाला आणि संघटनेपासून दूर गेला. काही दिवसांनंतर अत्यंत थंडीच्या रात्री त्या संघटनेच्या संघटना प्रमुखांनी त्याला भेटायचं ठरवलं. संघटना प्रमुख त्या पदाधिकाऱ्याच्या घरी गेले, तेव्हा तो पदाधिकारी घरात एकटाच आढळला. शेकोटीत जळत्या लाकडाच्या ज्वाळासमोर बसून ऊब घेत होता. अग्नीही गरम होत होती. त्या पदाधिकाऱ्याने प्रमुखांचे फार शांतपणे स्वागत केले. दोघे शांतपणे बसले होते. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते. फक्त शेकोटीतील अग्नी पेटत होता. थोड्या वेळाने संघटना प्रमुखांनी काहीच न बोलता शेकोटीतील एक पेटते लाकूड उचलून बाजूला ठेवले आणि पुन्हा जागेवर बसले. पदाधिकारी सर्व गोष्टींकडे लक्ष देत होता.
बऱ्याच दिवसांपासून एकटे राहिल्यामुळे त्याच्या मनालाही आनंद होत होता. परंतु त्याने पाहिले की, विभक्त लाकडाच्या आगीची ज्योत हळूहळू कमी होत आहे. काही वेळातच आग पूर्णपणे विझली. त्यात उष्णता शिल्लक नव्हती. काही काळापूर्वी, ज्या लाकडाकडे एक ऊबदार प्रकाश आणि ज्वाळा होती, तो काळा आणि निस्तेज तुकड्यांशिवाय काहीही उरला नव्हता. दरम्यान, दोघांनी एकमेकांना कमीतकमी शब्द बोलून अभिवादन केले. संघटना प्रमुखांनी निघण्यापूर्वी बाजूला उचलून ठेवलेले लाकूड उचलले आणि ते पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवले. ते लाकूड पुन्हा प्रज्वलित झाले आणि ज्वाला बनल्यामुळे त्याभोवती प्रकाश आणि उष्णता पसरली. जेव्हा तो पदाधिकारी संघटना प्रमुखांना सोडण्यासाठी दाराजवळ पोहोचला तेव्हा तो प्रमुखांस म्हणाला, “माझ्या घरी येऊन भेटल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज आपण काहीही न बोलता एक सुंदर धडा शिकविला आहे.’ त्यानंतर तो पदाधिकारी मोठ्या धडाडीने संघटनेत सक्रिय झाला. एकजुटीत मोठी शक्ती आहे. फक्त ती समजून घेऊन आजमावता आली पाहिजे.
सागर ननावरे