पुणे – जिल्ह्यात करोनामुळे दगावलेल्या पालकांच्या चार बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि संरक्षणासाठी महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले असून या बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना तसेच कोविडमुळे दोन्ही पालक वैद्यकीय उपचार घेत असलेल्या बालकांना काळजी आणि संरक्षणासाठी बाल कल्याण समितीमार्फत योग्य निर्णय घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांचे आर्थिक, मालमत्ता विषयक व कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
या बालकांना आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ द्या. या बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करा. तसेच आवश्यकता असल्यास दत्तक प्रक्रियेची मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
अनाथ बालकांसाठी हेल्पलाइन
अनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनास मिळण्यासाठी जिल्हास्तरावर बालकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये चाइल्ड हेल्पलाइन 1098, 8308-9922-22, 7400-0155-18 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.