कोपरगाव : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका काही केल्या संपत नाही. त्यातच आता या महामार्गावर टेम्पोला कारने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह दीड वर्षाची मुलगी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत. पती व चिमुकली जागेवर मृत झाले, तर पत्नीचे उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला होता.
संतोष अशोक राठोड (वय ३५), वर्षा संतोष राठोड (३५), अवनी संतोष राठोड (दीड वर्ष, रा. गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. शरद शिवाजी पवार (वय ३६, रा. ककडा भानू नाईक तांडा, पो. नेर, जि. जालना), एजाज सिराज पठाण (वय २४, रा. लोणार, ता. लोणार, जि. जालना), बलीबाई अशोक राठोड (५०), कृष्णा अशोक राठोड (२७), कोमल कृष्णा राठोड (१९, गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना), नितीन राम पवार (२८, रा. मंठा, जि. जालना) अशी जखमींची नावे आहेत.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंबीय जालना येथून विरार (मुंबई) येथे जात होते. कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांच्या कारने (एमएच २२ एच २५२३) पुढे चाललेल्या टेम्पोला (एमएच २०, सीटी ६६५६) मागून जोराची धडक दिली.
याप्रकरणी टेम्पोचे चालक पांडुरंग राजू पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार रणजित तुकाराम राठोड (३२, रा. महोदरी, ता. मंठा, जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.