ठाणे : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उरण भागातील चिरनेर भागातही पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी स्वत: एपीआय विशाल राजवाडे पूरग्रस्तांना मदतीचा करत होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजवाडे यांना मदतकार्य सुरु असताना विशाल राजवाडे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
या घटनेची माहिती पोलीस परिवार या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब लक्षात घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना फोन केला करून राजवाडे यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आदेश दिले. विशाल राजवाडे यांचा कर्तव्यांवार असताना मृत्यू झाल्याने जेवढी शक्य असेल तेवढी मदत त्यांच्या कुटुंबियांना करा, त्यांच्या कुटुंबियांतील व्यक्तीला अनुकंपतत्वावर घेता येऊ शकते का? याची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही वेदनादायी घटना असल्याचे म्हणत हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, चिरनेर गावात पुरामुळे 350 पेक्षा अधिक घरात पाणी शिरले होते. यामुळे येथील नागरिकांच्या घरात तीन ते चार फूट पाणी शिरले होते. या दरम्यान पूरग्रस्तांना मदत करताना एपीआय विशाल राजवाडे यांचा मृत्यू झाला. अशीच एक घटना इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी देखील घडली. बचाव कार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला. नवी मुंबई नगर नियमचे अग्निशमन दलाचे सहाय्यत केंद्रीय अधिकारी शिवराम धुमाणे असे त्यांचे नाव होते.
मदत कार्य करत असताना अचानक शिवराम यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालायत नेण्यात आले, मात्र रस्त्यातच शिवराम धुमाणे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.