कानपूर – कानपूरमधील मुख्य टपाल कार्यालयाने चक्क छोटा राजन आणि मयत गॅंगस्टर मुन्ना बजरंगी यांच्यावरील टपाल तिकीट वितरीत करायला सुरुवात केले असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची दखल टपाल विभागाने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या “माय स्टॅम्प’ या योजनेखाली राजन व बजरंगीचे प्रत्येकी 12 टपाल तिकीटे छापली गेली होती.
“माय स्टॅम्प’ योजना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याची ही चूक होती, असे पोस्टमास्टर जनरल व्ही.के.वर्मा यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
5 रुपये किंमतीच्या या टपाल तिकीटांची विनंती अज्ञात व्यक्तीकडून आली होती. या अज्ञात व्यक्तीने या टपाल तिकीटांसाठी 600 रुपयेही भरले होते. व्यक्तींच्या ओळखीची कागदपत्रे तपासणे आवश्यक असतानाही ती तपासली गेली नव्हती आणि ही 12 टपाल तिकीटे वितरीत केली गेली.
या प्रकरणी सकृतदर्शनी टपाल तिकीटांचा संग्रह करणाऱ्या “फिलेटली डिपार्टमेंट’चे प्रमुख रजनीश कुमार हे दोषी आढळले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि अन्य काही जणांना “कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने टपाल तिकीटासाठी या गुन्हेगारांचे फोटो स्वीकारले, त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही वर्मा यांनी सांगितले.
अशा चूका पुन्हा होऊ नयेत म्हणून कठोर उपाय योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत, 300 रुपये देणारी कोणतीही व्यक्ती त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो देऊन टपाल तिकीटे छापून प्रसिद्ध केली जाऊ शकत होते. छोटा राजन सध्या मुंबई तुरूंगात आहे आणि 2018 मध्ये उत्तर प्रदेशच्या बागपत कारागृहात बजरंगीची हत्या झाली होती.