केंदूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार केंद्र लॉकडाऊनमुळे बंद असल्याने मार्केटयार्डच्या बाजूला करंदीच्या हद्दीमध्ये खासगी जागेत भाजीपाला विक्री होत आहे. मात्र, त्याठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्याबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही अनधिकृत भाजी मंडई बंद करण्याची मागणी होत आहे.
मार्केट यार्डच्या बाजूला खासगी जागेत जागा मालकांचा आक्षेप असूनही अनधिकृत मंडईमध्ये चाकण, मोशी, पिंपरी, आळंदी, चिंचवड, भोसरी आदी भागातून व्यापारी येत आहेत. अगोदरच शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतीमालाची हे व्यापारी त्या ठिकाणी किरकोळ विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल विक्री करीत असल्याचे भासवत व्यापारी व्यवसाय करीत आहेत. सोशल डिस्टन्स पाळले जात नाहीत. काही व्यापारी, नागरिक मास्क वापरत नाहीत. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीने शिक्रापूर पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करीत माहिती दिली आहे.
मात्र, अद्यापही भाजी मंडई बंद होत नसल्याने तहसीलदार एल. डी. शेख यांच्याकडे तक्रार केल्याचे ग्रामस्थ सुभाष जगताप, संतोष ढोकले, भरत ढोकले, महेश जगताप यांनी सांगितले. दरम्यान, बाहेरच्या भागातून येणारे अनेक व्यापारी तिकडूनच भाजीपाला घेऊन येत त्याठिकाणी व्यापार करीत आहे. पर्यायाने आवक वाढल्याने स्थानिकांचा शेतीमाल कमी भावात घेतला जात आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी याबाबत पोलीस स्टेशनला कळविले आहे