नवी दिल्ली : विरोधी पक्षातील नेत्यांच्या चिथावणीचा परिणाम म्हणून दिल्लीतील हिंसाचार झाला असल्याचे भाजपने गुरुवारी म्हटले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या वर्षी झालेल्या “सीएए’विरोधी आंदोलनादरम्यान
“आरपार की लडाई’ आवश्यक असल्याचे म्हटले होते. दिल्लीतल्या हिंसाचाराचा संबंध सोनिया गांधी यांच्या वक्तव्याशी जोडण्याचा प्रयत्नही भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांच्या काही वक्तव्यांचाही संदर्भ जावडेकर यांनी दिला. आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या घरी विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दगड आणि पेट्रोल बॉम्ब जमा करण्यात आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीने दंगलींचे राजकारण केल्याचा आरोपही जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
दिल्लीत शांतता राखण्यासाठी “आप’च्या आमदारांनी प्रयत्न करायला पाहिजे. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दंगलीतील पीडीतांची वर्गवारी धर्माच्या निकषावर केली, अशी टीकाही त्यांनी केली.
दोन दिवसात दंगल कशी भडकली हा मुद्दा नाही. तर त्याची पूर्वतयारी दोन महिन्यांपासून सुरू होती. “सीएए’विरोधात दिल्लीत गेल्या वर्षी 14 डिसेंबरला झालेल्या रॅलीमध्ये सोनिया गांधी यांनी “आरपार की लडाई’चे आवाहन केले होते. प्रियांका गांधी वढेरा यांनी “शेकडो जणांना तुरुंगात टाकले जाईल’ असे म्हटले होते. तर राहुल गांधी यांनी “भिऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत’ असे म्हटले होते. ही वक्तव्ये चिथावणीखोर, “सीएए’चा गैरअर्थ लावणारी आणि लोकांमध्ये भीती उत्पन्न करणारी होती, असा आरोप जावडेकर यांनी केला.
भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या वक्तव्याबाबतचा विषय न्यायप्रविष्ट आहे. असे सांगून जावडेकर यांनी मिश्रा यांच्याबद्दल बोलणे टाळले. मात्र “आप’चे नेते अमानुल्ला खान आणि “एमआयएम’चे नेते वारिस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केल्यामुळे हिंसा भडकल्याचा आरोप केला. “आप’चे समन्वयक ताहिर हुसैन यांच्या घरात दंगलीची पूर्वतयारी केली गेली होती. तेथे दगड आणि पेट्रोल बॉम्बचा साठा आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.