सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग
कराड – “उंब्रज-पाटण मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा’ असे वृत्त दैनिक “प्रभात’ने छायाचित्रासह प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. या वृत्ताची तातडीने दखल घेऊन बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात केल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत नागरिकांनी “प्रभात’ला धन्यवाद दिले आहेत.
उंब्रज-पाटण रस्त्यावर चाफळ फाट्यापर्यंत असंख्य जीवघेणे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा आहे का, असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांना पडला होता. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमधून संतप्त भावना व्यक्त होत होत्या. नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
उंब्रज हे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथून पाटण, चिपळूणमार्गे कोकणात आणि तीर्थक्षेत्र चाफळकडे जाणारे रस्ते आहेत. या रस्त्यांकडेला असलेल्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करणे आवश्यक होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने साफसफाई न केल्याने अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर वेगाने वाहून डांबरीकरण उखडले होते. त्यामुळे असंख्य खड्डे पडून वाहने चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमधून वाहने जात असल्याने प्रवाशांची हाडे खिळखिळी होत होती.
पावसाळ्यात काही ठिकुाणी रस्ता खचला होता. साईडपट्ट्यांची अवस्थाही बिकट झाली होती. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा फटका प्रवाशांना बसत होता. याबाबत वस्तुस्थिती मांडणारे वृत्त दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.