लंडन :- लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाला कोणताही थेट धोका अमान्य असेल, अशी हमी ब्रिटनने दिली आहे. खलिस्तानी कट्टरवाद्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या धमकीच्या पार्श्वभुमीवर हे आश्वासन देण्यात आले आहे.
ब्रिटनमधील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामधील भारताच्या दूतावासांना लक्ष्य करण्याची धमकी खलिस्तानी संघटनानी दिली आहे. सोशल मीडियावरून दिलेल्या या धमकीच्या पोस्टमध्ये ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी आणि बर्मिंगहॅममधील भारतीय वाणिज्यदूत डॉ. शशांक विक्रम यांचे फोटोदेखील पोस्ट करण्यात आले आहेत. या धमक्यांमुळे भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे क्लेव्हर्ली यांनी म्हटले आहे.
मार्च महिन्यात खलिस्तानवाद्यांकडून लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवरील तिरंगा खाली खेचण्याचा प्रयत्न झाला होता. तेंव्हापासून इंडिया हाऊसच्या बाहेर लंडन पोलिसांचा सतत पहारा असतो.
कॅनडानेही घेतली गंभीर दखल…
खलिस्तानवाद्यांच्या धमकीची गंभीर दखल कॅनडानेही घेतली आहे. कॅनडाने दहशतवादाविरोधात नेहमीच कठोर कारवाई केली आहे. त्यामुळे आपले सरकार खलिस्तानवाद्यांविरोधात आणि दहशतवाद्यांविरोधात सौम्य भूमिका घेईल, असे मानणे चुकीचे असेल, असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी म्हटले आहे.
कॅनडामध्ये खलिस्तानी कारवाया वाढत असल्याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कॅनडाच्या दूतांना पाचारण करून समज देण्यात आली होती. त्यानंतर ट्रुडो यांनी ही भूमिका स्पष्ट केली.