पाचगणी, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्याचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात ऑनलाइन तक्रारींचा निपटारा करण्यात जिल्हा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या तक्रारींची प्रशासन दखल घेत नसल्याचा अनुभव तक्रारदारांना येत आहे. हे चित्र सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये दिसत आहे.
जनतेच्या समस्यांचा निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मिनी मंत्रालय कक्ष सुरू करण्याची संकल्पना हवेत विरून गेली आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियान महायुती सरकार राबवत असले, तरी सातारा जिल्ह्यात ‘जलद’ प्रशासनाचे गाजर सरकारकडून दाखवले जात असल्याची चर्चा आहे. शासनाच्या पोर्टलवर करण्यात आलेल्या ऑनलाइन तक्रारींची दखल घेण्यात अधिकार्यांना स्वारस्य नसल्याने जनतेत नाराजी आहे.
जिल्हा रुग्णालय, नगरविकास, मदत व पुनर्वसन, महसूल, जिल्हा परिषद आरोग्य आणि ग्रामपंचायत विभाग यांच्याकडील तक्रारी प्रामुख्याने अधिक संख्येने प्रलंबित आहेत. त्यामुळे तक्रारींचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागप्रमुखांचे कान टोचून, जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.