पळसदेव,(वार्ताहर) – सध्या बारामती मतदार संघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीचे पवार घराण्यातील दोन उमेदवार एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. यामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवारांनी मोठी मोर्चेबांधणी केली आहे.
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अशी ओळख महाराष्ट्राला आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शब्द घेऊन महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभेसाठी यातील कोणला त्याग करावा लागणार, याची चर्चा रंगली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केल्याने नेमकं अजित पवारांनी पाटील काय शब्द दिला, त्यावरून पाटील प्रचारास तयार झाले. आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने फसवलं,
अशी कायम ओरड करणारे पाटील यांना जर विधानसभेचा शब्द मिळाला असेल तर येणाऱ्या विधानसभेत विद्यमान आमदार भरणे यांना घरी बसावं लागणार की त्यांना अजून नवीन काही देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करणार, हे मात्र येणारी वेळ ठरवेल. त्यात सुरुवातीला तुतारीच्या प्रचार करणारे प्रवीण माने हे देखील अजित पवार गटात आहेत. माने विधानसभेची इच्छा मनात बाळगून आहेत. त्यामुळे त्यांचीही वेगळी व्यवस्था करण्याची वेळ राष्ट्रवादीवर येणार आहे.
भाजपचा एकसंघ मतांचा गठ्ठा
सध्या राष्ट्रवादीच्या मतांमध्ये विभाजन झाले आहे. तर भाजपची मते जागेवरच आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत पाटील यांचे महत्त्व वाढले आहे. मात्र, दहा वर्षांत आमदार भरणे यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे तालुक्यातील अगदी वाड्या- वस्त्यांवर केली आहेत.
लोकसभेसाठी भरणे यांचा राजकीय त्याग परवडणारा नाही. भरणे यांनी विविध विभागाचा निधी आणून तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही बाब सध्या जनतेला खटकत आहे.
राजकारण व प्रेमात सर्व माफ
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेला अजित पवार आपला दिलेला शब्द पाळणार की निकालानंतर पुन्हा गणित बिघडल्यास मागच्या वेळी सारखं होणार, हे मात्र येणारी वेळच ठरवेल. तसही राजकारणात आणि प्रेमात सगळं काही माफ असत, या म्हणीची प्रचिती पुन्हा इंदापूर तालुक्यातील जनतेल येईल. हे मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीच कळेल.