पळसदेव, {रामदास पवार} – वाढत्या उन्हामुळे थंड पाणी व थंड पदार्थांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील नागरिक वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी माठातील थंडगार पाण्याला पसंती देत आहेत; मात्र सध्या गावागावात फिल्टर पाण्याचे प्लँट झाल्याने सध्या नागरिक माठाऐवजी जारच्या पाण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे माठ बनवण्याचा व्यवसाय करणार्या कुंभार समाजावर संक्रात आली आहे.
मातीपासून बनवलेल्या गाडग्याचा वापर केवळ मकरसंक्रातीला होतो. उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी ग्रामीण भागात माठाचा वापर केला जातो; मात्र यातून वर्षभर उदरनिर्वाह चालवणायसाठी आवश्यक भांडवल उभे राहात नसल्याची खंत वरकुटे बुद्रुक येथील धनंजय रंगनाथ कुंभार यांनी व्यक्त केली आहे. कुंभार व्यवसायावर फिल्टरच्या पाण्यामुळे मोठं संकट आलं असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
कुंभार समाजाला वर्षातून केवळ दोन वेळच व्यवसाय होतो. एक संक्रातीला आणि दुसरा उन्हाळ्यात. सध्या माठाच्या किमतीदेखील अधिक नसल्याने अधिकच नफा होत नाही. सध्या पंधरा लिटरच्या माठाला शंभर रुपये, पंचवीस लिटरच्या माठाला दोनशे पन्नास, तीस लिटरच्या तीनशे रुपयाचा होलसेल दर आहे.
मार्केटमध्ये यापेक्षा अधिक दराने विक्री होते. या व्यवसायात फारसा नफा नसल्याने यात अधिक स्पर्धा नाही. मात्र आम्ही कुटुंबाने भाव भावकीत गाव वाटून घेऊन आम्ही मिळाल्या गावातच व्यवसाय करत असल्याने फारशा स्पर्धेचा सामना करावा लागत नसल्याचं मत या वेळी कुंभार यांनी व्यक्त केलं.
सध्या मातीचा दरदेखील वाढला असल्याने माठ बनवणे जिकिरीचे झाले आहे. परिसरात माठ बनवण्यासारखी माती नसल्याने नरसिंहपूर, अकलूज, भागातूल दहा हजार रुपयाला एक टिपर या दराने माती विकत घ्यावी लागते.
एका टिपरमध्ये वर्षभर काम चालतं एक कामगार चाकावर पूर्ण दिवस काम केल्यास 30 ते 40 माठ बनवतो व इतर काम पाहून केल्यास 10 ते 15 माठ होतात. यातून मजुरी व इतर खर्च वजा जात दररोज फारसा नफा राहत नाही. त्यामुळे सरकारने कुंभार समाजाला मदत करण्याची आवश्यकता आहे. -धनंजय कुंभार, व्यावसायिक