पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण. याच उजनीच्या पाण्यावर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर याच उजनीच्या पाण्यामुळे मासेमारी, मत्स्यतळ, जल पर्यटना सारखे रोजगारही अनेकांना उपलब्ध झाले आहेत. उजनीचे पाणी आता कृषि-जल पर्यटनालाही खुणावत आहे. उजनी जलसंपदेचा मोह आता शहरवासीयांना पडू लागल्याने यातून कृषि-जल पर्यटनाची संकल्पना गंगावळण येथे आकारास येत आहे.
गंगावळण हे गाव भिमा नदीच्या तीरावर वसलेले आहे. उजनी धरणाच्या निर्मीतीनंतर मुळचे गंगावळण गाव जलसमाधीस्त झाले. त्यातून पुढे ओसाड माळरानावर या गावाचे पुनर्वसन करण्यात आले खरे परंतु, आपले टुमदार गा उजनीच्या पाण्यात कायमचे गेल्याची आणि आपण माळरानावर आल्याची खंत येथील ग्रामस्थांना कायमच वाटत होती. मात्र, त्यानंतर जलाशयात पाणी साठविले जावू लागले, याच पाण्याने ओसाड माळरानावरील गंगावळणच्या वेशील स्पर्श केला. या पाण्याचा वापर शेतीसाठी होऊ लागला आणि जिरायत माळरानावरील गंगावळण गाव बागायत झालं.
गंगावळण गावाला उजनीच्या पाण्याने हळूहळू तिन्ही बाजुने वेढा घातला. त्यामुळे गंगावळण गाव केवळ बागायतीचं राहिलं नाही तर या गावाभोवती जलसंपदा नटू लागली. देश-परदेशातून येणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांमुळे या गावच्या सुंदरतेत आणखी भर पडत गेली. यातूनच कृषि आणि जलसंपदा लाभलेले गाव म्हणून गंगावळणची ख्याती वाढू लागली.
जलनिसर्गाची अनोखी देणखी लाभलेल्या आपल्या गावात कृषि-जल पर्यटनाची सांगड घालता येईल, असा विचार याचे गावचे महारूद्र पाटील यांच्या मनाला शिवून गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर तालुकाध्यक्ष म्हणून काम करीत असताना ही संकल्पना त्यांनी आमदार तथा आताचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे बोलून दाखविली. यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढेही ही संकल्पना मांडण्यात आली. यातून या टुमदार गंगावळण गावाला निसर्ग पर्यटन स्थळासाठी चालना युती सरकारमधील पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. पुढे याच मान्यवरांच्या समन्वयातून हा प्रकल्प आता गंगावळण येथे आकार घेत आहे. यासाठी निधी मिळविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे पाठबळ तर आमदार, राज्यमंत्री भरणे यांचे मोठे योगदान लाभत आहे.
गंगावळण गावाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. अथांग महासागरप्रमाणे भासणाऱ्या उजनीच्या पाण्यामुळे येथे हजारो किलोमिटरचा प्रवास करुन येणारे परदेशी पक्षी महराष्ट्रातीतीलच नव्हे तर देशभरातील पक्षीप्रेमी, तज्ज्ञांचे आकर्षण ठरू लागले आहे. उजनीच्या पाण्यात नौकाविहार करताना या पक्ष्यांचे होणारे दर्शन एक विलक्षण परवणी मानली जात आहे, अशा नौकाविहारा बरोबरच देशभरातून येथे येणाऱ्या पर्यटकांना गंगावळण येथे आता कृषि आणि जल पर्यटनाची सांगड घालून ग्राम संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. येथील पर्यटनस्थळाचे काम वेगाने सुरु आहे. या संकल्प उपक्रमातील प्राथमिक टप्पयातील कामेही मार्गी लागली आहेत.
गंगावळणच्या या पर्यटन विकासकामांची पाहणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी करून त्यासंदर्भात तालुकाध्यक्ष तथा या संकल्पनेचे शिल्पकार ठरणारे महारूद्र पाटील यांच्या कामाचे कौतूक केले आहे.
येथील काही आवश्यक कामांबाबत सुळेताईंनी संबंधीतांना सूचनाही केल्या आहेत. तर या वेळी नौकानयनाचाही आनंद घेत खासदार सुळे यांनी परिसराची पाहणी करीत स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांशी संवादही साधला. शहरी पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. गावकऱ्यांना संबोधीत करताना गावाच्या विकासासाठी आणि पर्यटनासाठी या पुढीलही काळात निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिलेली आहे. गंगावळणच्या कृषि-जल पर्यटनस्थळाच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार असल्याने राज्याच्या पर्यटनात “उजनी पॅटर्न’ म्हणून हा प्रकल्प ओळखा जाईल, अशी आशाही सुळेताईंनी व्यक्त केली आहे. यामुळे गंगावळण येथे उभे राहत असलेल्या पर्यटनस्थळाकडे केवळ इंदापुरचेच नव्हे तर सर्व राज्याचे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन नवनवीन उपाययोजना करीत आहे. पर्यटन विकासकामांची गती वाढविण्यासाठी, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावामध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे या उद्देशाने राज्य शासनाने ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम ही योजना घोषित केली आहे. याच मध्यमातून इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथे जलपर्यटन स्थळ साकारत आहे.
– महारूद्र पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदापूर तालुका अध्यक्ष
(संकलन : मधुकर गलांडे, बिजवडी)