लोणी धामणी (प्रतिनिधी) : शिरूर लोकसभा मतदार संघांचे 2024 चे खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच असणार असे वक्तव्य मतदार संघात पक्ष नेतृत्वाने करायचे आणि नंतर पुण्यात लोकसभेची तयारी करा असं सांगायचे. मला शिरूर मधून पुण्यात निवडणूक लढवायला सांगण्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा डाव आहे.
विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना हा मतदार संघ सुरक्षित ठेवायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाची मी केलेल्या फेसबुक पोस्ट वरून सुद्धा पक्ष नेतृत्वाने माझी न सांगता हाकलपट्टी केली व नंतर दै. सामनामध्ये आलेली बातमी चुकून छ्यापण्यात आली असे सांगण्यात आले. मात्र दै.सामनाचे संपादक संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादकांना न विचारता हकालपट्टीची बातमी आलीच कशी? हे विचार करण्यासारखे आहे.
दोन दिवसांनी मला मातोश्री वर बोलवण्यात आले व पुणे जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपली आघाडी आहे. त्यांच्याबरोबर जुळवून घ्यावच असं सांगण्यात आले. ज्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मी शिरूर मधून पळवून लावले. त्या राष्ट्रवादी पक्षाच्या छातडावर उभं राहून तीन वेळा खासदार झालो. पुणे जिल्ह्यात गेली सतरा वर्षे ज्या पक्षाच्या विरोधात संघर्ष केला.
सामान्य शिवसैनिकांवर होणारे अन्याय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होणारा त्रास अनेक वेळा मातोश्री दरबारी घेऊन गेलो मात्र तीन वर्षात पक्ष नेतृत्वाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. मी मात्र अजूनही शिवसैनिकांसाठी खंबीर पणे रात्रंदिवस झटत आहे. त्यामुळे पक्षाने वेळीच दखल न घेतल्यानेच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. असे मत शिरूर लोकसभेचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी धामणी (ता. आंबेगाव ) येथे गाव भेट दौरा कार्यक्रमात व्यक्त केले.
दरम्यान, आढळराव पाटील यांनी आंबेगाव पूर्व भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला व शासनाकडून नुकसान भरपाई साठी सर्वोपतरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. ग्रामपंचायत नवीन इमारतीसाठी पन्नास लाख, दलित वस्ती सभागृहासाठी वीस लाख रु. चे प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले असल्याचे यावेळी आढळराव पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, शिवसेना राज्य विस्तारक सचिन बांगर,ग्राहक संरक्षण समितीचे शिवाजी राजगुरू, सुनिल बाणखेले, सरपंच सागर जाधव, उपसरपंच आकाश जाधव, मिलिंद शेळके, सुभाष जाधव,गणेश ससाणे, अक्षयराजे विधाटे,व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.