मुंबई : राष्ट्रपुरुषांची आणि आई-वडिलांची शपथ घेणे हा गुन्हा असेल तो दहावेळा करीन, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. आपण ज्या राष्ट्रपुरुषांची नावे घेऊन महाराष्ट्राचा कारभार सुरु केला आहे. त्या राष्ट्रपुरुषांना अपेक्षित महाराष्ट्र घडवायाचा आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्रिमंडळावरील विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभाराच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी गेतलेल्या आक्षेपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजाची, आई-वडिलांची शपथ घेतली म्हणून विरोधकांना इंगळ्या का डसल्या? जो मुलगा आई-वडिलांना मानत नाही, तो जगाण्याच्याच लायकीचा नाही, असा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्या आक्षेपाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रपुरुषांचे नाव घेतले होते. त्यावरून सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.
आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. हा देश आपलाचा आहे. पण हे दैवत ज्या मातीत जन्माला आले त्या मातीत जन्मलेले आम्ही सर्व शिवभक्त आहोत. सभागृहात येण्यापूर्वी दडपण होते. वागायचे कसे हा प्रश्न होता. कारण मी मैदानातील माणूस आहे. या वैधानिक कामकाजाचा अनुभव नाही. रिकाम्या बाकांशी मी लढणार नाही. कारण मोकळ्या मैदानात तलवार बाजी करणाऱ्यांपैकी मी नाही. मी समोरासमोर लढणार आहे. शत्रुला अंगावर घेणार आहे, असे ते विरोधकांच्या सभात्यागामुळे रिकाम्या आसनांकडे पहात म्हणाले.