मुंबई – केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकारविरोधात एकटी शिवसेनाच आक्रमक भूमिका घेत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र आक्रमक होण्यात टाळाटाळ करत असल्याची नाराजी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील सदस्यांना टार्गेट करत असताना राष्ट्रवादी मवाळ भूमिका घेत आसल्याचे सांगून भाजपाला आव्हान देण्याची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याच्या काही घटनाही सांगितल्या.
13 मार्चला मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीमधील सायबर विंगच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय बदलण्यात आला आणि त्याजागी मलबार हिलमधील घऱी जबाब नोंदवण्यात आला.
नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवेसना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना दोन्ही बाजूंनी संयम राखावा आणि गोष्टी हाताबाहेर जाण्यापासून रोखावे असे सांगितले. सभापतींना शिवीगाळ केल्यामुळे भाजपाच्या 12 आमदारांना सभागृहातून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले तेव्हा देखील अजित पवारांनी पुन्हा संयमाची भूमिका घेतली याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
फक्त शिवसेनाच भाजपाशी लढत आहे. फक्त शिवसेनेसाठी नाही तर राष्ट्रवादीच्या वतीनेही आम्हीच लढत आहोत. शिवसैनिक फ्रंटफूटवर जाऊन लढत असताना राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर दिसत आहे. ज्याप्रमाणे त्यांना भाजपाविरोधात भूमिका घेतली पाहिजे तशी घेताना ते दिसत नाहीत, अशी शिवसेना नेतृत्वाची भावना आहे. ती शरद पवार यांच्याकडे मांडण्यात आली. शिवसेनेला भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांचा सामना करण्यासाठी पोलीस आपल्या बाजूला हवे आहेत आणि तिथेच मुळात हा वाद सुरु आहे.