दोन दिवसांत सगळे काही समजेल
मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यातील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासंदर्भात मिडियामधून येणाऱ्या बातम्यांवर शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना आणि भाजपात कोणतीही अडचण नसून तसा कोणीही गैरसमज पसरवू नये, असे स्पष्ट करतानाच विधानसभेतील जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या चर्चेतच ठरला आहे. हा फॉर्म्युला लवकरच जाहिर होईल. फॉर्म्युल्यासंदर्भात आम्ही मनातल्या मनात गोष्टी केल्या नसून जे काही केलय ते सर्वासमोर जाहिर केले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर युतीमधील तणाव आणि जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना नेत्यांची शिवसेना भवन येथे बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. गेले काही दिवस युतीच्या जागावाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले येत आहेत. त्याबददल विचारले असता, ते म्हणाले, युतीच्या जागावाटपाची चर्चा मिडियामधून ऐकतोय. या बातम्या पाहून मी सुद्धा आश्चर्यचकित झालो आहे. यात काही तथ्य नाही.
लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान मी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जी चर्चा झाली. त्यातच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, असे सांगतानाच यावेळी भाजपाकडे जागा मागण्यापेक्षा जो काही फॉर्म्युला ठरला आहे, त्यानुसार आपणच शिवेसेनेची यादी तयार करून द्या, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. ही यादी आल्यानंतर माझ्या पक्षातील जबाबदार नेत्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर युतीची घोषणा केली जाईल.
मुख्यमंत्री शिवसेनेची यादी पाठविणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच हा उपहास आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ते म्हणाले, राजकारणात प्रत्येकवेळी उपहास नसतो. एक-दोन दिवसांत ही यादी माझ्याकडे येईल. दोन दिवसांत सगळे काही समजेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. किशोर तिवारी हे शिवसेनेचे अधिकृत कृषीविषयक सल्लागार म्हणून काम पाहतील अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
पंतप्रधानांचा “तो’ टोला माझ्यासाठी नाही
राममंदिराच्या मुद्यावरून काही जण बोलघेवडेपणा करत असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील सभेत लगावला होता. त्याबददल विचारले असता, तो टोला माझ्यासाठी नव्हता. मी राममंदिराबाबत कधीच बोलघेवडेपणा केला नाही. मी केवळ तमाम हिंदूंच्या भावना व्यक्त केल्या. आता जर पंतप्रधान म्हणत असतील की न्यायालयात हा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयाच्या निकालाची वाट पाहूयात तर त्यांची ही विनंती रास्तच आहे. कारण न्यायालयच निष्पक्ष असा निवाडा करत असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारला कधी दगा दिला नाही
सरकार बहुमतात नसतानाही राज्यात स्थिर सरकार चालवून दाखविले असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यावर विचारले असता, शिवसेनेने पाच वर्षांत सरकारला कधीच दगा दिला नाही. सुरूवातीच्या काळात मंत्र्यांनी राजीनाम्याचा विषय काढला होता. पण तो केवळ सुरूवातीला होता. शिवसेनेचा पाठिंबा हा केवळ सरकारलाच नव्हता तर विधायक कामांना होता. विकासकामांमध्ये शिवसेनेचेही श्रेय आहेच असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
विकासाच्या प्रकल्पांना विरोध नाहीच
आरेबाबतीत तुम्ही संवेदनशील आहात तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबत वक्तव्य केले आहे, त्यावरून युतीमध्ये तणाव आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता उद्धव ठाकरे म्हणाले, युतीमध्ये अजिबात तणाव नाही. विकासाला आम्ही कधीच विरोध केलेला नाही. मेट्रो कारशेडलाही विरोध केलेला नाही. फक्त मेट्रोची कारशेड आरेमध्ये करण्याचा जो काही अट्टहास आहे त्याला आमचा विरोध आहे. नाणारचा विरोध स्थानिक जनतेने केलेला आहे. म्हणूनच आमचाही विरोध होता. आजही नाणारला स्थानिक जनतेचा विरोध आहेच.