Santosh Bangar On Uddhav Thackeray| लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. विविध जिल्ह्यात जाऊन ते जाहीर सभा घेत आहेत. यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला असल्याचे म्हणत बांगर यांनी हल्लाबोल केला. संतोष बांगर यांनी आज हिंगोलीत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले.
हिंगोली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी “मी संतोष बांगर यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन महापाप केलं होतं. आता या निवडणुकीत तुम्ही त्यांना धडा शिकवा, त्यांना पराभूत करा,” असे आवाहन मतदारांना केले होते. त्यावर संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना देऊन महापाप केल्याचे बांगर म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संतोष बांगर ?
“बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यांच्या पक्षात असतांना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. दंगल झाल्यावर अन्याय होऊ नयेत म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. सोमवारी मी मुंबईत असतांना एक वयोवृद्ध आजी भेटल्या. मी शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे माहित झाल्याने तिने माझी पाठ थोपटली,” असंही संतोष बांगर म्हणाले.
यावेळी बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवर देखील टीका केली. बांगर म्हणाले की, “2019 मध्ये मला उमेदवारी मिळाली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय होता. पण, कालच्या सभेला सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यासाठी सक्षम नेतृत्व लागते आणि माणूस देखील तसा लागतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी जे काही चेलेचपाटे जमा केले ते सर्व खंडण्या बहाद्दूर आहेत,” असेही बांगर म्हणाले.
हेही वाचा:
हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांची पक्षाला सोडचिट्ठी ; वाचा राजीनामा देण्याचे कारण काय ?