उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना फटकारले
मुंबई (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्या विमा कंपन्यांवर कडक कारवाई करून ही रक्कम त्यांच्याकडून परत घ्या. ती रक्कम शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई म्हणून द्या, अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. विमा कंपन्यांकडून 90 लाख शेतकऱ्यांना अपात्र कोणत्या निकषावर ठरवले जाते? असा प्रश्न उपस्थित करीत हा मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मातोश्री निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पिकविमासंदर्भात बोलताना विमा कंपन्यांना फटकारले. गेल्या वर्षी 1 कोटी 44 हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज भरले होते. त्यामध्ये 53 लाख शेतकरी पात्र ठरवले गेले आणि 90 लाख शेतकरी हे अपात्र ठरवले गेले आहेत. शिवसेनेने हा विषय घेतल्यानंतर 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विमा कंपन्यांकडे भरली जाणाऱ्या पीकविम्याच्या रकमेपैकी दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून, तर 98 टक्के रक्कम ही केंद्र व राज्य सरकारकडून दिली जाते. विम्याची 100 टक्के रक्कम ही करदात्यांच्या खिशातून भरली जात असताना या विमा कंपन्यांकडून 90 लाख शेतकऱ्यांना अपात्र कोणत्या निकषावर ठरवले जाते? असा सवाल करीत महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळ सरकार जाहीर करते तर तो दुष्काळ विमा कंपन्यांना कसा दिसला नाही, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
विमा कंपन्या चालबाजी करीत असतील तर त्यांच्याकडून सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेला पैसा परत घ्यावा आणि शेतकऱ्यांमध्ये वाटावा, अशी सूचना करतानाच यातला 100 टक्के पैसा हा जनतेचा, करदात्यांचा आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी दिला गेलेला आहे. तो शेतकऱ्यांना मिळायलाच हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सावरकरांना न माननाऱ्यांना भरचौकात फटकवा!
दिल्लीतील विद्यापीठात सावरकरांच्या पुतळ्याची करण्यात आलेल्या विटंबनेबाबत उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, सावरकरांचा अपमान राहुल गांधीनीही केला होता. जे लोक सावरकरांना मानत नाहीत त्यांना एकदा भरचौकात फटकवायला हवं. त्याशिवाय स्वातंत्र्यासाठी कुणी कुणी काय खस्ता खाल्यात ते कळणार नाही, असा शब्दात त्यांनी फटकारले.