मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावमधल्या पाचोरा येथे काल (रविवारी) सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजपाकडून सातत्याने होणाऱ्या घराणेशाहीवरील टीकेलाही उत्तर दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचा फकीर म्हणून उल्लेख करत हल्लबोल केला आहे. तर, आता उद्धव ठाकरेंच्या या व्यक्तव्याचा समाचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? ते म्हणतात ना, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं’. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला.
दरम्यान, आता पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केल्याने एकनाथ शिंदे चांगलेच भडकले आहे. मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर जगभरात असताना उद्धव ठाकरे यांनी द्वेषापायी हे वक्तव्य केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘हे दुर्दैवी वक्तव्य आहे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देशात नव्हे तर जगभरात सिद्ध केलंय. या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याची व्यवस्था केली आहे.
जी 20 चं यजमानत्व मिळवलं आहे. मोदींचा एकेरी उल्लेख करणं याची जेवढी निंदा, निषेध करणं तेवढा थोडा आहे. प्रत्येक देशवासियांना अभिमान वाटावा, असं त्यांचं काम आहे. संपूर्ण देशातील दीडशे कोटी जनता त्यांचा परिवार आहे. जनतेला ते आपलं मानतात. त्यांच्या मातोश्रींचं दुःख झालं तरीही त्यांनी देशातील प्रकल्पाला प्राधान्य दिलं. जे कालचं वक्तव्य झालं, ते वैयक्तिक द्वेषातून आलं आहे.’ असं शिंदे यावेळी म्हणाले.