मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून कामगिरीचे कौतुक केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केले जाणार आहे. तसेच मुंबईत नीरजचे भव्य स्वागत करणार असल्याची माहिती, कुटुंबातील सदस्याने दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत नीरजच्या कामगिरीसाठी गौरवोद्गार काढले. ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो’, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं. 13 ऑगस्टला नीरज चोप्रा आपल्या गावात येणार आहे. हरयाणातील खांदरा हे नीरज चोप्राचे मूळ गाव आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नीरजच्या कुटुंबीयांनी आपले मराठी कनेक्शनही सांगितले. १७६४ च्या तिसऱ्या पानिपत युद्धातून वाचलेले सगळ्या जाती-समाजाचे लोक हरयाणात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. सोनीपत, पानीपत, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथल आणि जिंद या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राणे, भोसले, चोपडे, मुळे, महले वगैरे आडनावे असलेला हा समाज राहतो. शेती, दुग्धउत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय.
सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरजचे कुटुंबचा व्यवसाय शेतीच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.