नॉटींगहॅम – भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतचा आज पाचवा दिवस आहे. मात्र पाऊस पडत असल्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. चौथ्या दिवसअखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अजून 157 धावांची गरज आहे.
इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली, मात्र पाचव्या दिवशी पाऊस पडत असल्यामुळे अद्यापही सामना सुरू झालेला नाही.
दरम्यान, चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांत रोखत दिवसाअखेर 14 षटकांत 1 बाद 52 धावा केल्या. भारताला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज आहे.
209 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर के. एल. राहुल आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरूवात केली. परंतु स्टुअर्ट ब्रॉडने के. एल. राहुल 26 धावांवर बाद करत भारताला पहिला झटका दिला. यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने नाबाद 18 धावांची भागिदारी करत इंग्लंडला आणखी यश मिळू दिले नाही.
तत्पूर्वी, चौथ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावातील 11.2 षटके आणि बिनबाद 25 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. इंग्लंडकडून सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्ली हे चौथ्या दिवशी फलंदाजीसाठी उतरले होते.
मात्र, बर्न्स फार काळ तग धरु शकला नाही. त्याला 16व्या षटकात मोहम्मद सिराजने यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कर्णधार जो रुटने 109 धावांची शतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला.
तर जॉनी बेअरस्टोने 30 आणि सॅम करनने 32 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2, तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.