पिंपरी – अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद असे कोणतेही बोलणे झाले नव्हते. शरद पवार यांनी सत्ता स्थापन करतेवेळी स्पष्ट सांगितले होते की, पुढील पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील. त्यामुळे अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद येण्याचा विषय नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 3) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आगामी विधान परिषद बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत होते. याविषयी विचारले असता पवार म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केला. आज शेवटचा दिवस होता. भाजपच्या दोन नेत्यांसोबत राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, कॉंग्रेसकडून सुनील केदार व शिवसेनेकडून अनिल देसाई या तिघांनी चर्चा केली. मात्र, त्यामधून मार्ग निघाला नाही. शेवटी आता सात उमेदवार उभे राहतील, असेही पवार यांनी सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग पिंपरी चिंचवड शहरामधून जात नाही. याबाबत पवार म्हणाले, मी सरकारमध्ये येण्यापूर्वीच या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. त्यापूर्वीचे त्याचे टेंडर झाले आहे. त्यामुळे चालू काम मी थांबवू शकत नाही. मात्र, त्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने विद्यापीठातील उड्डाणपूल पाडावा लागला कारण त्याशिवाय मेट्रोचे जाळे उभे राहू शकत नव्हते. आता तीन मजली उड्डाणपूल त्याठिकाणी उभारण्यात येणार आहे.
मी कशाला दुसऱ्यांच्या घरात डोकवू
पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी बीडमध्ये एक कार्यक्रम घेतला. मात्र, त्या कार्यक्रमाला भाजपमधील कोणीही नेता उपस्थित नव्हता. यावर भाजप पंकजा मुंडे यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे का, असे विचारले असता पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, मी कशाला दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकवू. कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही हा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये मी काय बोलणार, असा टोलाही लगावला.