मुंबई : वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. “उद्धव ठाकरे खेळ तर आता सुरू झाला आहे,”असे त्यांनी यावेळी म्हटले.
#WATCH Republic TV Editor Arnab Goswami released from Mumbai's Taloja Jail following Supreme Court order granting interim bail pic.twitter.com/YzGfIm3wGo
— ANI (@ANI) November 11, 2020
“उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले. तसेच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचे ते म्हणाले. “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असेही त्यांनी आक्रमक होत म्हटले. तसेच अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच महाविकास आघाडी सरकाला त्यांची जागा दाखवून दिल्याचेही म्हटले. दरम्यान, सरकारने राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठापुढे अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचही मत यावेळी न्यायालयाने नोंदवले.