नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेने मी हे पाऊल उचलले आहे. मोदी-शहा देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात असून त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्र आणि राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या विचारातून भाजपचे कार्य सुरु आहे. त्यांच्या प्रेरणेतून काम सुरुच राहील. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल. आम्हाला बहुमतही मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. ते राजे जरी असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. जनतेत काम करत असल्याने युवकांचे त्यांच्यावर प्रेम आहे. उदयनराजेंच्या भाजपमध्ये येण्यामुळे पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
उदयनराजे यांनी काल (13 सप्टेंबर) रात्री खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता नव्याने निवडणूक लढून रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील आणि पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेत जातील.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी उदयनराजे भोसले हे एक होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे मानले जात आहे. तसेच आता साताऱ्यात पोटनिवडणूक पार पडणार असून ती विधानसभेबरोबर पार पडेल किंवा त्यानंतर हे पाहावे लागणार आहे. परंतु हा गड आपल्याकडे राखण हे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. यापूर्वी उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे.