सातारा -सभासद शेतकऱ्यांची परिपूर्ण यादी असतानाही सातारा जिल्हा बॅंकेने शेतकरी वैद्यकीय (मेडिक्लेम) गटविम्याचा प्रीमियम कंपनीकडे भरला नाही. योजनेच्या घोषणा करून त्याची कार्यवाही करायची नाही, हा कोणता “यशवंत’ विचार आहे?
पाताळयंत्री व्यक्तीच्या अकार्यक्षमतेने सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या तळतळाटाचा जाब विचारायची वेळ आली आहे, असा घणाघात खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, शेतकरी वैद्यकीय गटविमा योजना बॅंकेने जुलै 2021 पासून लागू करण्याचे जाहीर करताना, सोसायटीची थकबाकी नसण्याची अट घातली. शेतकरी सभासदांनी उधार उसनवार, गहाणवट करून थकबाकी भरली. सोसायटी सचिवांनी अथक परिश्रमाने शेतकरी सभासदांची माहिती कळवूनही कपाळकरंट्या संचालकांनी त्यांच्या गटविम्याचा प्रीमियम भरलाच नाही.
संचालकांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या योजनेचा बॅंकेने गाजावाजा केला. शेतकऱ्यांचा प्रीमियम बॅंकेच्या स्वनिधीतून भरण्याचे जाहीर केले होते. 31 जुलै 2021 पर्यंत सोसायटीचे कोणतेही कर्ज नसावे, या निकषात बसणाऱ्या शेतकरी कुटुंबातील एका सदस्याच्या वैद्यकीय खर्चाची हमी बॅंकेने घेतली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन लाख 53 हजार सभासद व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, अशा पाच लाख लोकांची यादी बॅंकेला मुदतीत सादर करण्यात आली, तरीही प्रीमियम बॅंकेने भरला नाही. बॅंकेने धरसोडीचा कारभार करून “यशवंत’ विचारांना तिलांजली दिली आहे. जे काही आहे, ते इथेच फेडायचे आहे. हे पाप कुठे फेडणार आहात?