नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील बांदा येथील गोशाळेतील काही गायींना जिवंत पुरण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारावरून तसेच गोशाळांच्या सध्याच्या स्थितीवरून कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या प्रकरणावरून पंतप्रधान मोदी हे उत्तरप्रदेश सरकारला जाब विचारणार आहेत काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गायींना जीवंत पुरण्यात आल्याच्या वृत्ताचे कात्रण प्रियाकांनी आपल्या ट्विटर हॅंडलला जोडून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारी प्रशासनाने बांद्यात शकडो गायींनी जीवंत पुरले आहे असे या वृत्तात म्हटले आहे याकडे लक्ष वेधून प्रियाकांनी म्हटले आहे की योगींच्या सरकारी प्रशासनात गायी सुद्धा क्रुरतेच्या बळी ठरल्या आहेत.
पंतप्रधान आज उत्तरप्रदेशात आहेत. ते या विषयावरून योगी सरकारला जाब विचारणार आहेत काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. उत्तरप्रदेशातल्या एका गोशाळेतील 124 गायी मध्यप्रदेशात नेऊन तेथे त्या जीवंत पुरण्यात आल्याचे संबंधीत वृत्तात नमूद करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणात संबंधीत सरकारी अधिकाऱ्याला निलंबीत केले आहे