आज 13 डिसेंबर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टी गाजवलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचा स्मृतिदिन दिन. स्मिता पाटील म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला पडलेले एक सुखद स्वप्नच.
पुणे येथे 17 ऑक्टोबर 1955 रोजी स्मिता पाटील यांचा जन्म झाला. तेथेच बालपण. तारुण्यात थिएटर अकादमी, एफटीआयआय परिसर येथे बहरलेली नाट्यकला पुढे मुंबई येथे स्थलांतर, दूरदर्शन मध्ये वृत्तनिवेदक आणि मग चित्रपट सृष्टी असा स्मिता पाटील यांचा प्रवास आहे.
कला आणि व्यावसायिक म्हणजे आर्ट फिल्मस् आणि कमर्शियल फिल्मस् या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांतून यशस्वी झालेले काही ठराविकच कलावंत, त्यात स्मिता यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
ऐंशीच्या दशकात आजी, माजी सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दोघांचीही हिरॉइन म्हणून स्मिता यांनी काम केले. त्या काळातील चित्रपट हे मोठ्या प्रमाणात नायकप्रधान चित्रपट होते; पण स्मिता यांच्या भूमिकेला या चित्रपटातून न्याय मिळाला. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या समवेत स्मिता पाटील यांनी सामना, जैत रे जैत, उंबरठा, सुबह हे चार चित्रपट केले.
तर श्याम बेनेगल यांच्या समवेत चरणदास चोर, निशांत, मंथन, भूमिका, कोंडुरा, अनुग्रहम् हे सहा चित्रपट केले. साधारणतः 1974 ते 80 च्या दरम्यान या दोन्ही प्रतिभावंत दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून स्मिता यांच्या आभिनयाचे विविध पैलू आपणास दिसले. अगदी सामना चित्रपटातील छोटीशी भूमिका ते जैत रे जैत, उंबरठा, सुबहची मुख्य नायिका तसेच चरणदास चोर मधील राणी ते कोंडुरामधील पार्वती ही भूमिका, या चित्रपटांत स्मिता नावाचा हिरा विविध पैलू पडून तो अधिक तेजस्वी झाला.
जैत रे जैत या चित्रपटात स्मिता यांनी प्रेमाकरिता आपले सर्वस्व पणाला लावणारी एक आदिवासी तरुणी साकारली. तसेच त्यांची सुलभा महाजन ही भूमिकाही खूप गाजली. स्त्री मुक्ती चळवळीवर आधारित असलेली ही भूमिका होती. समांतर अथवा आर्ट फिल्म बद्दल तर काही बोलायलाचं नको! कारण त्या चित्रपटांतून केलेल्या स्मिता पाटील यांच्या भूमिका पाहताना त्यांनी अभिनयाची गाठलेली उंची लक्षात येते.
चक्र आणि आक्रोश या जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर निर्माण झालेले चित्रपट. केतन मेहता यांच्या मिर्च मसाला या चित्रपटातील क्रांतिकारी शेतकरी ही भूमिका स्मिता यांनी साकारली. कसम पैदा करने वाले की व डान्स डान्स सारखे डिस्को डान्स प्रधान चित्रपट तसेच घुंगरू हा एक चित्रपट त्यांचे विशेष नृत्य असलेला चित्रपट. अमृतमधील त्यांची वयस्कर भूमिका त्याकाळी खूप गाजली. मंडी या चित्रपटातील खट्याळ खोडकर बन्नो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
1974 ते 1986 या कालावधीत त्यांनी जवळपास 70 चित्रपट केले. यात मराठी, हिंदी, गुजराती, तेलगु अशा विविध भाषिक चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात वारिस हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट सृष्टीत उंच शिखरावर असतानाही त्यांनी नाटकाला प्राधान्य दिले होते. छिन्न हे वामन तायडे लिखित नाटक त्यांनी आय.एन.टी.साठी केले होते. आपला सह अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत चित्रपटांतून काम करत असताना त्यांच्याशी अधिक जवळीक निर्माण झाली. प्रेम झाले आणि त्यांनी विवाह केला. हा विवाहदेखील त्याकाळी खूप गाजला होता. प्रतीक या आपल्या छोट्या बाळाला जन्म देऊन अवघ्या दोन दिवसांत स्मिता यांनी आपली इहलोकीची यात्रा 13 डिसेंबर 1986 ला संपविली. एका गुणी अभिनेत्रीचा दुःखद अकाली अंत झाला. स्मिता पाटील यांना अभिनयासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार दोन वेळा मिळाले. 1977 भूमिका, 1980 चक्र या चित्रपटांसाठी. पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा सत्कार चौपाटीवर करण्यात आला, ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच जैत रे जैत व उंबरठासाठी मराठी फिल्म फेअर आणि चक्रसाठी हिंदी फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना मिळाले. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ 2013 ला टपाल तिकीट काढले आहे.
– डॉ. राजू पाटोदकर