पुणे – मुलीचे शिक्षण, भवितव्याचा विचार करत तब्बल दहा वर्षांपासून वेगळे राहणारे पती-पत्नी दोघे पुन्हा एकत्र आले. त्यांनी नव्याने संसार सुरू केला आहे. लोकअदालतमध्ये केलेल्या समुपदेशनामुळे हे शक्य झाले आहे. 15 वर्षीय मुलीला आता आई-वडिलांची माया एकत्र मिळणार आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांचे नावे आहेत. तो व्यावसायिक आहे. तर ती गृहिणी आहे. 2003 मध्ये दोघांचा पारंपारिक पध्दतीने पाहणी करून विवाह झाला. त्यानंतर दोघांना एक मुलगी झाली. दरम्यानच्या काळात दोघात वैचारिक मतभेद वाढले. ती पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागली. त्यातून वाद विकोपाला गेले. ती मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. ती परत आलीच नाही. मुलगी आता 15 वर्षांची आहे. दरम्यान तिच्या पतीने ती नांदायला यावी, यासाठी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली. ऍड. संतोष गोविंद काशिद यांच्यामार्फत दावा दाखल केला. या दाव्यावर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान हे प्रकरण लोकअदालतमध्ये समुपदेशनासाठी पाठविण्यात आले. न्यायाधीश गिराडकर यांच्या पॅनेलने दोघांचे समुपदेशन केले. मुलगी आणि वडिलांचे नाते घट्ट असते. वाद वाढल्यास अथवा घटस्फोट झाल्यास मुलगी आणि वडिलांचे नाते कायमचे तुटेल. मुलीचे शिक्षण, भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. तिच्या भविष्यासाठी आणि उर्वरित राहिलेले आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी दोघांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे समुपदेशातून पटवून देण्यात आले. ते दोघे एकत्र आले.