पुणे – महापालिकेच्या ठेकेदार कंपनीने खोदलेल्या खड्डयात पडून दुचाकीवरील दोघे रविवारी रात्री जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. खंडू हनुमंत पुजारी (23) असे मृताचे नाव आहे.
महादेव सूर्यवंशी (25) हा जखमी झाला आहे. कात्रजमधील सुखसागरनगर लेन 31 मधील रस्ता आणि पुलाचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तपास अधिकारी उपनिरीक्षक अतुल थोरात म्हणाले, “ही कंपनी रस्त्याचे आणि नाल्यावरील पुलाचे काम करत आहे. नाल्यावर रस्ता खोदण्यात आला आहे. मोटार सायकलस्वाराला रस्ता अंधारामुळे दिसला नाही. कंपनीने काम करताना तेथे सूचनाफलक किंवा सुरक्षेविषयक निकष पाळले नाहीत. हे दोघे काम संपवून ते कात्रजमधील गोकुळनगरच्या दिशेने जात होते. ते गल्लीत शिरले आणि खोदलेल्या भागात आणि नंतर नाल्यात पडले.
स्थानिक रहिवासी प्रेम धावरे म्हणाले, “रात्री माझे मित्र आणि मी जेवणानंतर भटकत होतो. त्यावेळी दोन मोटरसायकलस्वार लेनमध्ये आले आणि थेट नाल्यात पडले. रॉडवर आदळल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. माझ्या मित्रांनी नाल्यात उडी मारली आणि त्यांना बाहेर काढले. त्यानंतर आम्ही कारमधून त्यांना रुग्णालयात नेले. घटनास्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था आणि सूचनाफलक नव्हते. पोलिसांनी अपघातस्थळी भेट दिल्यानंतर मंगळवारी बॅरिकेड्स आणि सुरक्षा चिन्हे लावण्यात आली.’
या पूल आणि रस्त्याचे काम पाच महिन्यांपासून सुरू आहे आणि ठेकेदाराने कधीही बॅरिकेड्स किंवा डायव्हर्सन बोर्ड लावले नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. दरम्यान, दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने घटनास्थळाला भेट दिली, पण कंपनीचा अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कॉललाही उत्तर दिले नाही.
“पुढील कायदेशीर कारवाईसाठी आम्ही पुणे महानगरपालिकेकडून कामाचा तपशील मागितला आहे. याप्रकरणी पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व कंपनीचे अभियंता सचिन कुरणे, शैलेश जाधव व लापसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-जगन्नाथ कळसकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरोधकांनी दिलेल्या जागांची होणार चौकशी
महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या प्रस्तावास मान्यता द्यावी, यासाठी भाजपने स्थायी समितीची बैठक सुमारे तासभर थांबवली होती. तसेच एकमताने हा निर्णय मंजूर करावा, अशी भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वच पक्षांनी त्यास विरोध केला. त्यामुळे या निर्णयानंतर स्थायी समितीच्या बैठकीत 2008 पूर्वी महापालिकेच्या माध्यमातून समाजविकास, भवन, आरोग्य आदी विभागांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर दिलेल्या विविध मिळकतींची चौकशी करून माहिती संकलन करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष रासने यांनी दिले आहेत. महापालिकेच्या जागावाटप नियमावलीपूर्वी भवन विभागामार्फत 266 मिळकती भाड्याने दिल्या आहेत. जवळजवळ 1625 भाड्याने दिलेल्या मिळकतींची थकबाकी 54 कोटींची असल्याने हे आदेश दिल्याचे रासने म्हणाले.