नाही तर बलुचिस्तानचा बांगलादेश होईल
नवी दिल्ली, ता. 18 – बलुचिस्तानातील घटनात्मक प्रश्नावर “राजकीय तोडगा’ निघाला नाही तर बांगलादेशाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल व त्याला तोंड द्यावे लागेल, असा इशारा नॅशनल अवामी पार्टीचे नेते खान अब्दुल वलीखान यांनी दिला. वलीखान म्हणाले, नॅ. अ. पक्ष हा बलुचिस्तानात बहुमताने निवडून आलेला आहे. त्याला मान्यता दिली नाही तर केंद्रातील पीपल्स पार्टीचे बहुमत देखील आम्ही मानणार नाही.
हॉकी खेळाडूंसाठी 10 हजारांचे बक्षीस
मुंबई – भारतीय हॉकी संघाने “विश्वचषक’ जिंकल्यास संघास दहा हजार रुपये बक्षीस देण्यात येईल असे खलिद अन्सारी यांनी जाहीर केले. हे बक्षीस 16 खेळाडू, मॅनेजर, तज्ज्ञ शिक्षक यांत वाटले जाईल.
खासगी उद्योगांना अधिक सवलती
नवी दिल्ली – सध्याच्या धोरणात बसतील अशा निर्यात विषयक सवलती खासगी उद्योगांना दिल्या जातील, असे उपमंत्री ए. सी. जॉर्ज यांनी सांगितले.
“आझाद’ काश्मिरात उपासमार
नवी दिल्ली – हाजीपीर आणि नीलम या व्याप्त काश्मीरमधील लोकांची उपासमार चालली असून ते गवत खाऊन जगत आहेत, असे जम्मू काश्मीर लिबरेशन लीगच्या नेत्याने सांगितले.
शेख अब्दुल्ला व अझीझ यांची भेट
नवी दिल्ली – पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेते अझीझ अहमद व शेख अब्दुल्ला यांची अचानक भेट झाली. अब्दुल्ला इंदिरा गांधी यांना भेटून परत येत होते. याचवेळी सकाळच्या वाटाघाटी संपवून अझीझ बाहेर येत होते. अझीझ म्हणाले, “शेखसाहेब आता आपण खूप तरुण दिसता’. शेख साहेबांनी त्यांचे आभार मानले. त्यांनी एकमेकांची विचारपूस केली.