पुणे – दोघा सराईत गुन्हेगारांचा पालघनने वार करुन खून करण्यात आला. ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील पांडू लमाण वस्तीत पहाटे घडली. दरम्यान, रात्री उशिरा तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.
अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर (35) आणि सुभाष ऊर्फ किसन राठोड (40, दोघेही रा. लमाण तांडा येरवडा) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. सुभाष राठोड याचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शंकर चव्हाण (55) , बादल चव्हाण (25), विकास चव्हाण (28), अनिल देवरा (50), रोहित उर्फ निखील संखे (20), निशांत चलवादी (20), कृष्णा उर्फ काल्या (20) आणि एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. लमाण तांडा) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष राठोड याने तेरा वर्षांपूर्वी शंकर चव्हाण याच्यावर गोळीबार केला होता. त्या गुन्ह्यात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता. येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातून पहाटे तीनच्या सुमारास अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड आणि लक्ष्मण राठोड हे दुचाकीवरुन चालले होते.
यावेळी 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले. यावेळी लक्ष्मण कसाबसा सुटला. मात्र अनिल आणि सुभाष दोघेही टोळक्याच्या तावडीत सापडले. टोळक्याने त्यांच्यावर पालघनने वार केले. यामध्ये दोघेही जागीच मृत झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
दोघाही मृतांवर खूनाचा प्रयत्न, हाणामारी असे गुन्हे दाखल होते. सुभाष राठोडला खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात 2008 मध्ये शिक्षा झाली होती. यानंतर 2014 मध्ये तो शिक्षा भोगून बाहेर आला. यानंतर दोघांनी पुन्हा परिसरात दहशत माजवण्यास सुरवात केली होती.त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती. यानंतरही त्यांची दहशत कायम होती. ही बाब शंकर चव्हाण याला खटकत होती. स्वत:वर झालेल्या गोळीबारीचा बदला आणि दहशत संपवण्यासाठी शंकर चव्हाण संधी शोधत होता. मागील काही दिवस तो राठोडवर पाळत ठेऊन होता.