मंचर – मंचर नगरपंचायत होण्यासाठी भाजपकडून सर्वपक्षीय आयोजित एक दिवसीय आंदोलनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही, अशी माहिती मंचर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास बाणखेले यांनी दिली.
मंचर ग्रामपंचायतीची सहा महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी नगरपंचायत लवकर केली जाईल, असे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला म्हणून भाजपच्या वतीने मंचर नगरपंचायत लवकर होण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केले.
या उपोषणाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. या पार्श्वभूमीवर मंचर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास बाणखेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंचर येथे नगरपंचायत व्हावी, ही भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आहे.
शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा त्यास पाठिंबा आहे. नगरपंचायत होण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते प्रयत्न करत आहेत. आंदोलन करुन सरकारला तसेच प्रशासनाला पक्षाच्या वतीने कुठल्याही प्रकार वेठीस न धरण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कोणीही पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होत असतील तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यामध्ये पक्षाची कोणतीही भूमिका नसेल.
-सुहास बाणखेले, मंचर शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस