उमेश सुतार
ज्या पक्षाने तब्बल 20 वर्षांपूर्वी ज्यांचा पराभव केला. त्यांच्या दारात पुन्हा तोच पक्ष लोकसभेची निवडणूक लढवा, अशी विनंती करत आहे. मात्र, मतदारसंघातील मतदार हा केंद्रबिंदू मानत मतदार देतील तो निर्णय अशी ठाम भूमिका घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसांतून विधानसभेसाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्री पंढरपूर देवस्थान समिती अध्यक्ष अतुलबाबा भोसले व पृथ्वीराजबाबा चव्हाण या दोन “बाबां’मध्येच कराड दक्षिणचा सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणात उतरण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यांना शह देण्यासाठी तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरु होती. माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण की माजी खासदार श्रीनिवास पाटील या चर्चांना ऊत आला. वीस वर्षांपासून कराड व सातारा लोकसभा मतदारसंघापासून बाजूला असलेले पृथ्वीराज यांचे नाव चर्चेत आल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले.
जिल्हा आजपर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विचारांनी पुढे गेल्याचा इतिहास आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 1984, 1989 आणि 1991 तीनदा प्रतापराव भोसले यांनी प्रतिनिधित्व केले. 1996 ला शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर खासदार झाले. 1998 ला मात्र कॉंग्रेसचे अभयसिंहराजे भोसले यांनी हा मतदारसंघ काबीज केला. 1999 ते 2014 पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आला. त्यात दोन वेळा लक्ष्मणराव पाटील दोनदा खासदार झाले.
2009 पासून उदयनराजे भोसले राष्ट्रवादीकडून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर 1971 ला कराड लोकसभा मतदारसंघातून आनंदराव उर्फ दाजीसाहेब चव्हाण निवडून आले होते. त्यानंतर 1977, 1989 ला श्रीमती प्रेमलाताई चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 1991, 1996, 1998 अशा तीन निवडणुकांमध्ये पृथ्वीराजबाबांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1971 ते 1998 पर्यंत या मतदारसंघावर चव्हाण घराण्याचेच वर्चस्व होते.
कॉंग्रेसमधून 1999 मध्ये शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती केली. त्यावेळी कराड मतदारसंघातील शिराळा व कराड दक्षिण वगळता सर्व आमदार हे त्यांच्याबरोबर गेले. 1999 ला लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रित झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. श्रीनिवास पाटील यांनी 1999 आणि 2004 ची लोकसभा निवडणूक लढवली. पण 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्ररचना करण्यात आली आणि 1971 पासून अस्तित्वात असणाऱ्या कराड लोकसभा मतदारसंघाचे नाव संपुष्टात आले. त्यानंतर पृथ्वीराजबाबांनी राज्यसभेवर जाऊन सलग सात वर्षे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून काम करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी त्याग ही त्यांची असलेली पावती म्हणूनच त्यांना 2010 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले.
त्यांनी 2014 अखेर राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले व ते पुन्हा जनतेचा कौल आजमावण्यासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सामोरे गेले.
यावेळी विद्यमान आमदार आणि 35 वर्षे दक्षिण कराडची खिंड अबाधित ठेवलेले विलासराव पाटील- उंडाळकर यांनी बंडखोरी केली. तर अतुल भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळीही पृथ्वीराज बाबांनी सुमारे 16 हजाराच्या मताधिक्क्यांनी ही निवडणूक जिंकली.
काका गटाची भूमिका निर्णायक…
या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात पृथ्वीराजबाबांना शह देण्यासाठी अतुलबाबांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. मतदारसंघातील कोपरान्कोपरा पिंजून काढला आहे. एवढेच नव्हे तर पुणे, मुंबईस्थित मतदारांपर्यत पोहचून त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मतदारसंघात भाजप सरकारच्या माध्यमातून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा सातबारा मतदारांपर्यत पोहचविण्यासह पृथ्वीराजबाबा गटातील काही नेतेमंडळींना आपल्या तंबूत खेचून आणण्यातही अतुलबाबा यशस्वी झाले आहेत.
कराड दक्षिणमध्ये ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांचे प्राबल्य आहे. त्यांच्याच विचारांवर चालणारे त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील- उंडाळकर (दादा) हे आपल्या रयत संघटनेची फौज घेवून विधानसभेसाठी सज्ज झालेले आहेत. कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तरी लढायचे आणि नाही दिले तरी रयत लढणारच. या भूमिकेवर उंडाळकर गट ठाम असल्याचे दिसून येते. एकंदरीतच कराड दक्षिण मतदारसंघात दोन बाबांमध्ये जोरदार सामना रंगणार असून काका गटाची भूमिका निर्णायक ठरण्याचे सद्यस्थितीत संकेत मिळत आहेत.