वडगाव मावळ – तांत्रिक बिघाड झाल्याने वडगाव मावळ सह तालुक्यातील 39 ठिकाणच्या पोस्ट ऑफिसचे सर्व्हर तब्बल 25 तास डाऊन झाले होते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
वडगाव येथे न्यायालय, तहसील कार्यालय तसेच नोंदणी कार्यालय असल्याने या ठिकाणी नागरिकांची पोस्टात अनेक प्रकारची कामे असतात. कागदपत्रे इतर ठिकाणी पाठवणे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित दैनंदिन कामाचे व्यवहार होत असतात. पण सोमवारी (दि. 9) रोजी सकाळी 10 वाजता पोस्ट ऑफिसचा सर्व्हर डाऊन झाला आणि पोस्टातली कामे ठप्प झाली. “वरूनच सर्व्हर डाऊन झाल्याने आम्ही काही करू शकत नाही’, असे उत्तर पोस्टातील अधिकारी नागरिकांना देत होते.
सर्व्हर डाऊनमुळे पोस्टातील सर्व ऑनलाइन सेवा जागच्या जागी स्तब्ध झाल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी बारा वाजल्यानंतर सर्व्हर डाऊनची समस्या सुटली. पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन लॉगिनने कामे रजिस्टर करूनच पुढची कार्यवाही केली जाते. परंतु 25 तास लॉगिन होत नसल्याने नवीन कोणत्याही प्रकारचे पार्सल पोस्ट ऑफिस मार्फत नागरिकांना करता आले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
भारतीय पोस्ट सेवा ही भारतातील केंद्र सरकारच्या टपाल खात्यामार्फत “इंडिया पोस्ट’ या ब्रॅंड नावाने चालविली जाते. खेडेगावातील नागरिक यातील सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असतात. ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विविध माध्यमातून एखाद्या गोष्टीचा फक्त फोटो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी इमेल किंवा मोबाईलद्वारे पाठवला जातो. परंतु नागरीकांना एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सेवेवर अवलंबून राहावे लागते. खासगी कुरियर कंपन्यांनी पोस्ट खात्याशी स्पर्धा सुरू केली आहे. मात्र स्पर्धेच्या युगातही पोस्ट खात्याकडून विश्वास जपला आहे. सतत सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्याने नागरिकांना सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
महिला व वृद्धांचे हाल
पोस्टातील विविध कामांसाठी शेकडो नागरिक येत असतात. सोमवारी सकाळी 11 वाजता सर्व्हर डाऊन झाले. थोड्या वेळेत सेवा पूर्ववत होईल या आशेने नागरिक दुपारी तीन वाजेपर्यंत बसून होते. पोस्टातील कर्मचाऱ्यांसाठीच कार्यालयात स्वच्छतागृह आहे. इतर नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. अनेक पोस्ट कार्यालयाच्या जवळपास सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला व वृद्धांचे हाल झाले. मंगळवारी दुपारी पोस्टाची सेवा सुरू झाली. मात्र वेळेचे कारण देत दुपारी तीन वाजता पुन्हा सेवा बंद करण्यात आली.