“रब ने बना दी जोडी’ हा सिनेमा आला. प्रेक्षकांनी तो डोक्यावर उचलून धरला. “तुझ मे रब दिखता है, यारा मैं क्या करू? सजदे सर झुकता है यारा मै क्या करू?’ अर्थात, तुझ्यात मला परमेश्वर दिसतो, त्याला मग मी काय करू? आणि माझ्या परमेश्वरासमोर मला नतमस्तक व्हावंसं वाटत असेल, तर ते तू कसं नाकारू शकतेस? अशा अर्थाचं हे गाणंही रसिकांना फार आवडलं होतं. यातला “यार’ हा शब्द पत्नी, प्रेयसी, सखी अशा कोणत्याही अर्थाने घेता येईल. पती हे परमेश्वराचं रूप आहे. त्याची पूजा करायला हवी. हा संस्कार मुलींवर लहानपणापासून केला जातो. पण त्याचवेळी स्त्री ही आदिशक्तीचं, आदिमायेचं रूप आहे. पुरुषानेही तिच्यातल्या त्या आदिमायेच्या रूपासमोर नतमस्तक का होऊ नये?
आमच्याकडे पुरुषसत्ताक संस्कृती आहे, असं आम्ही म्हणतो. कोठून आली ही पुरुषसत्ताक संस्कृती? आमच्या सर्वच देवतांनी आपल्या अर्धांगीनीला अत्यंत सन्मानाची वागणूक दिल्याचे आमची पुराणे सांगतात. राजकीय इतिहाससुद्धा महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात होती, असेच सांगतो. मग, पुरुषप्रधान संस्कृती उदयाला आली कशी? मुळात लग्न म्हणजे पुरुषाने जबाबदारी घ्यावी आणि स्त्रीने घरातलं काम करावं. स्त्रीने घरादारावर प्रेम करावं आणि तिने पुरुषाच्या स्वाधीन व्हावं, असं आपण का गृहीत धरतो. लग्न झालं की प्रेम आपोआप निर्माण होईल, असं गृहीत धरलं जातं. पण प्रत्येकवेळी तसं होतंच असं नाही. मग कुटुंब विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभं राहतं, अथवा चार भिंतीच्या आत दोघेही तडजोड करत राहतात. रंग उडालेल्या संसारात प्रेमाचे रंग शोधत राहतात. काही संसार कडेला जातात काही मोडून पडतात.
दोघांच्या संसारात वादावादीची वेळ येते तेव्हा बऱ्याचदा तीच माघार घेते. घराचे खिळखिळे झालेले वासे सावरत राहते. कारण तिच्यावर तसे संस्कार असतात. अक्षता, सप्तपदी यांच्या पावित्र्यात तिच्या भावना गुंतलेल्या असतात. आपण चुकीचं पाऊल उचललं आणि वेगळे झालो, तर आपल्या आईवडिलांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल. शिवाय आईवडिलांच्या पश्चात भावाच्या संसारात आपली जागा कुठे? हा प्रश्न असतोच. ती कमावती असेल, तर थोडा वेगळा विचार करू शकते. वेगळं व्हायचा निर्णय घेऊ शकते. तरीही नवा डाव मांडणं तिच्यासाठी फार सोपं नसतंच.
संसार म्हणजे तडजोड असते. संसार म्हणजे दुसऱ्याला समजावून घेणं असतं. उणिवा प्रत्येकात असतात त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजावून घेणं हीच सुखी संसाराची गुरूकिल्ली असते. पण अलीकडे कोणी एकमेकांना समजावून घेण्याच्या फंदात पडत नाही. बऱ्याचदा तिला राजाराणीचा संसार हवा असतो. तिच्या संसारात कोणाची लुडबुड तिला नको असते. ती कमावती असेल तर समोरच्या व्यक्तीने मला हवं तसं वागायला हवं, अशी अपेक्षा करते. संसारापेक्षा, कुटुंबापेक्षा स्वाभिमान अधिक महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या क्षणी दोघे विभक्त होण्याचा निर्णय घेतात. हा प्रसंग दोघांसाठीही कठीणच असतो. तिच्यासाठी तर वेगळी चूल मांडणं फारच कठीण असतं. परंतु महिन्याकाठी येणारा पगार हा मोठा आधार असतो. त्यामुळे अलीकडे खिळखिळे वासे सावरत राहाण्याच्या फंदात कोणी पडत नाही.
ती रब आहे, ती आदिमाया आहे, ती आदिशक्ती आहे, तीच या सृष्टीची निर्माती आहे, बीज असून उपयोग नसते, ते रुजण्यासाठी माती हवी असते, ती माती आहे, तीच सृजनाचा आधार आहे. ती नसेल तर सृष्टी नाही. परंतु या गोष्टीचं भान ना तिला उरलं आहे ना त्याला उरलं आहे. ती देवी व्हायचं नाकारते आणि तो तिची पूजा करायचं नाकारतो. तिच्याशिवाय जीवाचं अस्तित्व शक्य नाही. ती गर्भ धारण करते, मरणप्राय यातना सोसून ती नवा जन्म देते, निसर्ग निर्मित अन्न ग्रहण करण्याची देहाची कुवत नसते तेव्हा तीच छातीशी घेते. मग असं असताना तिची पूजा का करू नये?
बरं तिची पूजा करायची म्हणजे रोज तिच्यावर शेंदूर थापायचा नाही. धूप आरती करायची नाही. तिच्यासमोर लोटांगण घालायचं नाही, तिला दंडवत घालायचा नाही. तिची पूजा करायची म्हणजे काय करायचं, तर तिच्याविषयी मनात आदर भाव बाळगायचा. ती माणूस आहे. तिला भावना आहे. तिला तिचा विचार आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. तिच्या भावनेचा आदर करायचा. तिच्या समाजपोषक विचारांना खतपाणी घालायचं. समाजाने तिला समजून घ्यायला हवंच. पण तिनेही स्वतःला ओळखून वागायला हवं. साने गुरुजींनी “शामची आई’ लिहिली. आईची थोरवी गाणाऱ्या कितीतरी साहित्यकृती आहेत. पण तिच्या थोरवीची जाणीव समाज विसरत चालला आहे.
रामायणात रामाने रावणाचा वध केला असेल. परंतु रामायणात सीतेला कुठेही दुय्यम स्थान नाही. महाभारतात कृष्ण महत्त्वाचा आहेच परंतु राधासुद्धा पूजनीय आहे. मीरेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. देवांनीही स्त्रीचा अनादर केल्याचं दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्त्रीला अत्यंत सन्मानाने वागवलं आहे. असं असतानाही आज स्त्रीवर अत्याचार का होत आहेत? स्त्रीला तिच्यातल्या दैवी गुणांचा विसर पडला आहे की पुरुषाला तिच्याविषयी आदर उरला नाही. असं का झालं आहे? शिक्षणाने आम्ही स्त्रीचा आदर करायला विसरलो असू तर शिक्षणाने आम्हाला काय दिलं? आज स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हा मन पिळवटून निघतं.
सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्ती स्त्रीचा अनादर करण्याची शक्यता कमीच असते. ज्या व्यक्ती स्त्रीकडे चुकीच्या भावनेने बघतात, तिच्यावर मानसिक तसेच शारीरिक अत्याचार करतात ते अशाप्रकारचे लेख वाचत नाहीत. स्त्रीवर अन्याय, अत्याचार करण्याची मानसिकता जिथून येते तिथे घाव घातला पाहिजे. त्यासाठी स्त्रीनेच पुढाकार घ्यायला हवा. तरच पुरुषांची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलेल आणि “तुझे मे रब दिखता है, यारा मै क्या करू’ असं म्हणत तो तिची पूजा मांडेल. अन्यथा स्त्रीचं उदात्त रूप फक्त कथा, कादंबऱ्यांपुरतं, सिनेमांपुरतं उरेल.
आरसा
विजय शेंडगे