मुंबई – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा हे या प्रकरणातील आरोपी असून या सर्वांनाच अटक करण्यात आली आहे. त्या सर्व आरोपींची चौकशी करायची असल्याने त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. तथापि, लोअर कोर्टाने अर्णब व अन्य दोन आरोपींना थेट न्यायालयीन कोठडी दिली आहे. या निर्णयावर पोलीस समाधानी नसल्याने त्यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी अलिबाग सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अर्णब यांना यापूर्वी अलिबाग कारागृहाचे कोविड सेंटर म्हणून जे ठिकाण आहे त्या शाळेच्या इमारतीत त्यांना ठेवण्यात आले होते.
उच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
अर्णब गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. या अर्जावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कोणतीही तारीख निश्चित न देता आपला निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, आरोपी नियमित जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतात, असे नमूद केले.