पुणे – सध्या पावसाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. पुण्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि कोकण या शहरांमध्ये खूप नुकसान झालेले आहे. कोल्हापूर मध्ये जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले आहेत. पंपिंग स्टेशन मध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे.
नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. त्यात कोल्हापूर महानगरपालिकेकडे टँकर अपुऱ्या संख्येत उपलब्ध आहेत त्यामुळे अडचण होत आहे. कोल्हापूर आयुक्तांनी, या धर्तीवर पुणे महानगरपालिकेकडे टँकर ची मदत व्हावी अशी विनंती केली. प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार, पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर काल कोल्हापूर ला रवाना करण्यात आले.
टँकर्स बरोबर supervisor, electrician, इ असे एकूण २१ जण आज सकाळी कोल्हापूर ला सुखरूप पोहोचले. साधारण एक आठवड्याच्या कालावधीची तयारी करण्यात आली आहे. या कालावधी मध्ये सगळ्यांच्या निवासाची तसेच खाण्याची सम्पूर्ण सोय कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
आपत्ती च्या काळामध्ये, जितकी शक्य होईल तितकी मदत इतर शहरांना करायची पुणे महानगरपालिकेची परंपरा चालू ठेवण्यात आलेली आहे. वेळेत व तत्काळ मदत केल्याबद्दल आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांनी पुणे महानगरपालिकेचे आभार मानलेले आहेत