पुणे –खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या परिसरात रविवारी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून, रविवारी सायंकाळपर्यंत 791 क्युसेकने विसर्ग सुरू होता. प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 21.92 टीएमसी म्हणजे 75.21 टक्केइतका उपलब्ध झाला आहे.
खडकवासला धरण परिसरात रविवारी दिवसभरात 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पानशेत- 28, वरसगाव- 24 आणि टेमघरमध्ये 60 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
खडकवासला धरणात 1.81 टीएमसी म्हणजे 91.81 टक्के इतका पाणीसाठा आहे, तर पानशेतमध्ये 8.76 टीएमसी, वरसगावमध्ये 9.14 टीएमसी, टेमघरमध्ये 2.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पानशेत धरणात 83 टक्के पाणीसाठा तर वरसगाव मध्ये 72 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ही दोन्ही धरणे लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत. शनिवारी सायंकाळी खडकवासला धरणातून 7 हजार 872 क्युसेकने विसर्ग सुरू होता.
आतापर्यंत अडीच टीएमसीपेक्षा जास्त विसर्ग
खडकवासला धरण 70 टक्के भरल्यानंतर धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मागील चार दिवसांत खडकवासला धरणातून मुठा नदीत 2.58 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले आहे. नदीत सोडण्यात येणारे पाणी पुढे उजनी धरणात जाऊन मिळते.